मुंबई : राज्यात दिवाळीनंतर शैक्षणिक संस्थेतील नववी ते अकरावीचे वर्ग सुरु करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्यानुसार आता शाळा सुरु करत असताना स्थानिक प्रशासनाने योग्य ती खबरदारी घेऊनच शाळा सुरु कराव्यात असेही राज्य सरकारकडून सांगण्यात आले आहे. दरम्यान,मुंबईच्या शाळा सुरु करण्याबाबतचा निर्णय हा पूर्णपणे स्थानिक प्रशासनाचा आहे. तसेच याबाबत आपण मुंबईच्या आयुक्तांसोबत चर्चा करुनच निर्णय घेतला असल्याचे शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी म्हटले आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव असलेल्या जिल्ह्यांतील शाळा सुरु करत असताना स्थानिक जिल्हा अधिकारी, गट विकास अधिकारी व शिक्षण अधिकारी यांनी विचार विनिमय करूनच विद्यार्थ्यांचे आरोग्य आणि शैक्षणिक हित जपूनच निर्णय घ्यावा अशा सुचना देण्यात आलेल्या आहेत. या आदेशानुसार राज्यातील शाळा सुरू होण्याच्या दृष्टीने स्थानिक प्रशासनाचा निर्णय महत्त्वपुर्ण ठरणार आहे. शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी या संदर्भात शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांना योग्य त्या सुचना दिल्या आहेत. प्रत्यक्ष वर्ग सुरु झाले नाही तरी ऑनलाईन शिक्षण पध्दती चालूच राहणार आहे. कोरोना महामारीच्या संकटात विद्यार्थी आणि शिक्षकांचे आरोग्य जपण्यासाठीच शिक्षण विभागाने हा निर्णय घेतला असल्याचे शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितले.
मुंबई महापालिका क्षेत्रातील सर्व खासगी, सरकारी, महापालिकेच्या शाळा 31 डिसेंबरपर्यंत बंद राहणार आहेत. मुंबई महापालिका आयुक्त इक्बाल चहल यांनी हे आदेश दिले आहेत. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे हे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे येत्या सोमवारपासून म्हणजेच 23 नोव्हेंबरपासून राज्यातील इतर भागांमध्ये नववी ते बारावीचे वर्ग सुरु होणार असले तरी मुंबईतील शाळा आता नवीन वर्षातच सुरु होण्याची शक्यता आहे.
डिसेंबरनंतर पुढील शैक्षणिक वर्ष कसं सुरु करता येईल याचा रोडमॅप तयार करता येईल याचा विचार मुंबई महापालिका प्रशासन आणि शिक्षण विभाग करत आहे. दरम्यान, ज्या ठिकाणी कोरोनाचा प्रादुर्भाव कमी आहे त्याठिकाणी योग्य ती खबरदारी घेऊन शाळा सुरु करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे.