नवी दिल्ली – दहशतवाद ही जगभरातली आजची सर्वात मोठी समस्या झाली आहे आणि त्यासाठी दहशतवाद्यांना संरक्षण आणि पाठिंबा देणाऱ्या देशांना जबाबदार धरले पाहिजे असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज 12 व्या ब्रिक्स शिखर परिषदेला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून संबोधित केलं त्यावेळी ते बोलत होते.
रशियाच्या नेतृत्वाखाली ब्रिक्सच्या दहशतवादविरोधी धोरणाला अंतिम स्वरुप मिळाल्याबंद्दल मोदी यांनी आनंद व्यक्त केला. भारत आपल्या नेतृत्वात हे धोरण आणखी पुढे नेईल असा विश्वासही मोदी यांनी यावेळी व्यक्त केला.
ब्रिक्सचे नेतृत्व करताना भारत सदस्य देशांमधे देशांमध्ये डिजिटल आरोग्य आणि पारंपरिक औषधांना चालना देण्याचा प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले. औषध उत्पादन क्षेत्रात भारत सक्षम असल्यानेच, करोना लॉकडाऊनच्या काळात दीडशेहून अधिक देशांना औषधांचा पुरवठा करू शकल्याचे त्यांनी नमूद केले.
भारताची लस उत्पादन आणि वितरणाची क्षमता मानवजातीसाठी मदतीची ठरणारी आहे. यावेळी पंतप्रधानांनी दुसऱ्या महायुद्धात शहीद झालेल्या सैनिकांना श्रद्धांजली वाहिली. या युद्धात युरोप, आफ्रिका आणि दक्षिण पूर्व आशियासारख्या क्षेत्रांमधे भारतातले 25 लाखांहून अधिक सैनिक सहभागी झाले होते असंही त्यांनी सांगितले.
संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेत बदल होणे गरजेचे
संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेत बदल होणं अत्यंत महत्त्वाचे असून, याबाबतीत स्थायी सदस्यत्वाकरता भारताला ब्रिक्स देशांचा पाठिंबा अपेक्षित आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.
अनेक आंतरराष्ट्रीय संस्था बदलत्या काळानुसार काम करत नाहीत, जागतिक आरोग्य संघटना, जागतिक व्यापार संघटना, आंतरराष्ट्रीय नाणेनिधी यासारख्या संस्थामध्ये सुधारणा होणे आवश्यक आहे, असेही ते म्हणाले.