मुंबई इंडियन्सने यंदाच्या आयपीएल स्पर्धेचे विजेतेपद मिळवताना विक्रमांचे एव्हरेस्ट सर केले आहे. स्पर्धेचे पाचवे विजेतेपद, तसेच सलग दुसरे विजेतेपद असे एकेक टप्पे पार करत आता मुंबईचा संघ आयपीएलच्या इतिहासातील सर्वात बलाढ्य संघ म्हणून पुढे आला आहे. या स्पर्धेने गेल्या 13 वर्षांच्या इतिहासात केवळ भारतीय संघालाच नव्हे तर क्रिकेट खेळत असलेल्या जगातील सर्वच संघांना सेकंड बेंच पुरवणारी स्पर्धा अशी नवी ओळख निर्माण केली आहे. आयपीएलने यशाचे एक एव्हरेस्टच जणू सर केले असून जगातील सर्वात यशस्वी स्पर्धा अशी ख्यातीही आयपीएलने मिळवली, यात शंका नाही.
प्रत्येक स्पर्धेत त्यांची कामगिरी दृष्ट लागण्याजोगी झालेली आहे. त्याला कारणही तसेच आहे. कर्णधार रोहित शर्माचे अत्यंत चपखल नेतृत्व, संघातील खेळाडूंमध्ये असलेले अफलातून बॉंडिंग, प्रशिक्षकांची मेहनत व सर्वात महत्त्वाचे म्हणजे संघाच्या मालकांनी खेळाडूंवर दाखवलेला विश्वास. या सर्व गोष्टी जुळून आल्या तरच इतिहास घडतो.
स्पर्धेच्या पहिल्या वर्षी मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या मार्गदर्शनाखाली मुंबई संघाचा प्रवास सुरू झाला आणि आज यशाची एकेक शिखरे पादाक्रांत करत मुंबई संघाने विक्रमांचे एव्हरेस्ट सर केले आहे. त्यांच्याकडे जगातील सर्वात भेदक गोलंदाजांचा ताफा आहे, सर्वात आक्रमक फलंदाज आहेत. दिशा देणारा कर्णधार आहे. सर्व संघाची यशापयशाची जबाबदारी स्वीकारण्याची मानसिकता असलेला रोहित शर्मा एक कर्णधार म्हणून नव्हे तर एक प्रमुख फलंदाज म्हणूनही यशस्वी झाला आहे.
यंदाच्या स्पर्धेत देखील सुरुवातीच्या काही सामन्यांत आलेले अपयश विसरून त्यांनी केलेला खेळ खरोखरच कौतुकास्पद आहे. त्यांनी प्रत्येक सामन्यांत आपल्या क्षमतेपेक्षाही जास्त सरस खेळ केला व त्यासाठीच यंदाच्या विजेतेपदावरही त्यांचाच हक्क होता. मुंबईचे यश पाहता या स्पर्धेने केवळ त्यांनाच नव्हे तर सहभागी झालेल्या सर्वच संघांना अनेक प्रकारचा लाभ दिला. 2013, 2015, 2017, 2019 व 2020 या पाच वर्षी मुंबईने ही स्पर्धा जिंकली. एकाच स्पर्धेत पाचवेळा विजेतेपद मिळवणे लीग स्पर्धेतीलच नव्हे तर देशांतर्गतच काय, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्येही कोणत्या संघाला जमलेले नाही.
या स्पर्धेच्या इतिहासात रोहितला कोणीही सर्वोत्तम कर्णधार असे संबोधले नव्हते. सगळेच महेंद्रसिंग धोनी, विराट कोहली, लोकेश राहुल, डेव्हिड वॉर्नर यांनाच जास्त मान देत होते. मात्र, रोहितने या सगळ्यांवरच मात करत आपली गुणवत्ता सिद्ध केली. या विजेतेपदासाठी त्याने स्वतःपेक्षा सर्व खेळाडूंच्या जिद्दीला व सांघिक खेळाला महत्त्व दिले यातच त्याची मानसिकताही दिसून आली. मुंबईचे यश हे केवळ एका लीगमधील एका संघाचे यश समजले जाऊ नये, कारण या यशात जे मानकरी आहेत, त्यात जे भारतीय खेळाडू आहेत, त्यांना उज्ज्वल भविष्यकाळ आहे, यात शंका नाही.
यंदाच्या स्पर्धेतून भारतीय संघाला भविष्यात अत्यंत गुणवान खेळाडू मिळणार आहेत. या स्पर्धेतील कामगिरी भारतीय संघात स्थान मिळवण्याचा निकष नाही, असे जरी काही वर्षांपूर्वी बीसीसीआयने म्हटले होते तरीही ते प्रत्यक्षात नवी गुणवत्ता डावलूच शकत नाहीत, हे देखील यंदा सिद्ध झाले. याच स्पर्धेतील कामगिरीवरून आगामी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेसाठी संघ निवड झाली व त्यात या स्पर्धेतील अनेक नवोदितांनाही संघात स्थान मिळाले. म्हणजेच आता ही स्पर्धा खऱ्याअर्थाने भारतीय संघालाच नव्हे तर जागतिक क्रिकेटमधील अनेक देशांच्या संघांना सेकंड बेंच पुरवणारी ग्लोबल लीग ठरली आहे.
क्रीडारंग
अमित डोंगरे