मुंबई – येत्या सोमवारी (16 नोव्हेंबर) पाडव्यापासून राज्यातील सर्व मंदिरे, प्रार्थनास्थळे उघडण्यास परवाणगी देण्यात आली आहे, अशी माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली आहे. मंदिरे उघडल्यानंतर भाविकांनी काही नियमावलीचे पालन करणे आवश्यक आहे. हा फक्त सरकारी आदेश नसून श्रीं ची इच्छा समाजा! असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नागरिकांना आवाहन करताना म्हटले, दिवाळीचे मंगल पर्व सुरू झाले आहे. प्रथेप्रमाणे अभ्यंगस्नान झाले तसेच नरकासुर वधही झाला. नरकासुररूपी चिराटी फोडली असली तरी वर्षभर नरकासुराने घातलेला धुमाकून विसरता येणार नाही. सध्या हा राक्षस जरी थंड पडला असल्याचे दिसत असले तरी बेसावध राहू नका.
राज्यातील नागरिकांनी या काळात शिस्तीचे पालन केले. म्हणूनच इतर राज्याच्या तुलनेत महाराष्ट्राची स्थिती हाताबाहेर गेलेली नाही. महाराष्ट्रावर साधू-संतांची, देव-देवतांची नेहमीच कृपादृष्टी राहिलेली आहे. तरी देखील शिस्त, सावधगिरी म्हणून होळी, गणेशोत्सव, नवरात्र, पंढरपूरची आषाढी वारी झाली नाही. एवढेच नाही तर इतर धर्मीयांनी देखील ईद, माऊंट मेरीसारख्या जत्रांबाबत शिस्त पाळली आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले.
भाजप आध्यात्मिक आघाडीकडून सरकारच्या निर्णयाचं अभिनंदन-
उशिरा का होईना पण ठाकरे सरकारने मंदिरे उघडण्याचा निर्णय घेतला. दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर त्यांनी घेतलेल्या निर्णयाचं आम्ही स्वागत करतो. याचे श्रेय साधुसंतांच्या, भाविकांच्या आंदोलनाला जातं. नियमांचं अत्यंत काटेकोरपणे पालन केलं जाईल, अशी प्रतिक्रिया भाजपच्या आध्यात्मिक आघाडीने दिलीय.