-हिमांशू
आज धनत्रयोदशी. धन, लक्ष्मी, कुबेराची पूजा करण्याचा दिवस. शिवाय देवांचे वैद्य धन्वंतरी यांचा जन्मदिवस. धन आणि आरोग्य देणाऱ्या देवतांची पूजा एकाच दिवशी करणारे तुम्ही-आम्ही “आरोग्यम् धनसंपदा’ म्हणजे आरोग्य हीच संपत्ती आहे, असं मानतो.
या पार्श्वभूमीवर, यंदाच्या धनत्रयोदशीला उत्कृष्ट आरोग्यापेक्षा मोठं धन कोणतं असणार! तज्ज्ञांच्या अंदाजाप्रमाणं दिवाळीनंतर करोनाची दुसरी लाट येऊ देऊ नको, आमचं आरोग्यरूपी धन अबाधित राहू दे, हीच प्रार्थना यावर्षी भगवान धन्वंतरींच्या चरणी सर्वजण करतील, यात शंकाच नाही. तथापि, धनत्रयोदशीला पूजन करावं असं आणखी एक मोठं धन आपल्यासमोर आहे. या धनाची किंमत ज्याला समजली तो जिंकला! दिवाळीसाठी मिळालेला हा अनमोल नजराणाच म्हणावा लागेल. या दुर्मीळ नजराण्याला वाळवंटातलं ओऍसिस असं नाव देऊन हे धन टिकावं, वाढावं म्हणून प्रार्थना केलीच पाहिजे.
वर्षभर केंद्र आणि राज्यात विविध कारणांनी मिनिटामिनिटाला तणाव अनुभवल्यानंतर दिवाळीच्या पूर्वसंध्येला सुखद धक्का देणारी ही घटना म्हणजे आपल्यासाठी “दिवाळी भेट’च! करोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी महाराष्ट्रानं सामान्य माणसाला केंद्रस्थानी मानून अनेक आदर्श निर्णय घेतले आणि त्यांचं अनुकरण इतर राज्यांनी केलं पाहिजे, असं कौतुक खुद्द केंद्राने केलं. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे या उपाययोजनांचा आढावा घेताना केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी महाराष्ट्राचं केलेलं कौतुक मूठभर मांस वाढवणारं आहे.
महाराष्ट्र शासनानं करोनाच्या चाचण्यांचे दर सर्वसामान्य नागरिकांना परवडतील इतके कमी केले. एचआरसीटीसारख्या महागड्या चाचण्याही सामान्यांच्या आवाक्यात आणल्या. प्लाझ्मापासून मास्कपर्यंत सर्वच उपयुक्त गोष्टींच्या दरावर नियंत्रण ठेवलं. खासगी रुग्णालयात 80 टक्के बेड करोना रुग्णांसाठी राखीव ठेवले. “माझं कुटुंब, माझी जबाबदारी’सारखा उपक्रम राबवून, घरोघर जाऊन आरोग्य तपासण्या केल्या; प्रबोधन केलं. महात्मा फुले जनआरोग्य योजना सर्व नागरिकांसाठी लागू करण्यात आली. या सगळ्या निर्णयांचं डॉ. हर्षवर्धन यांनी तोंडभरून कौतुक केलं. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी राज्य शासनाच्या अन्य उपक्रमांची माहिती दिली.
जिल्हा स्तरावर टास्क फोर्स नेमणं, प्रत्येक रुग्णालयात डेथ ऑडिट कमिटी स्थापणं, “लवकर निदान, लवकर उपचार’ हे सूत्र सांभाळून काम करणं अशा अनेक उपाययोजनांवर चर्चा झाली. राज्य सरकारनं केलेल्या उपाययोजना पुरेशा आहेत की नाहीत, याविषयी सातत्यानं कलगीतुरा रंगताना दिसत होता. शिवाय, या ना त्या कारणामुळे केंद्र-राज्य संबंधांमध्ये सातत्यानं तणाव दिसतो आहेच. कधी अटक-सुटकांवरून, कधी अंमली पदार्थांवरून, कधी बॉलीवूडच्या स्थलांतरावरून तर कधी मेट्रो कारशेडवरून केंद्र आणि राज्यात (आणि उभयतांच्या पाठीराख्यांमध्येही) एकसारखा कलहच दिसतोय. त्या पार्श्वभूमीवर, चांगल्या कामाचं झालेलं कौतुक खूपच सकारात्मक!
भारतानं स्वीकारलेली संघराज्य पद्धती राजकारणामुळे खिळखिळी होतेय की काय, अशी धास्ती अनेकांना वाटू लागलीय. चांगल्याला चांगलं म्हणण्याचा मोठेपणाही राजकारणामुळे दुर्मीळ होत चाललाय. अशा पार्श्वभूमीवर घडलेली ही सुखद घटना म्हणजे लोकशाहीचं धनच! केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी जो दिलदारपणा दाखवून दिला, त्याचं अनुकरण गल्लीस्तरावरच्या राजकारण्यांनी आणि मुख्यत्वे सोशलवीरांनी करायला हवं.