आंतरशालेय मैदानी स्पर्धा सुरू होत्या. पाचवी ते सातवी इयत्तेसाठी विविध स्पर्धा उत्साहवर्धक वातावरणात सुरू होत्या. विविध वर्ग आणि त्यांच्या तुकड्यांत जिंकण्यासाठी चढाओढ सुरू होती. वर्गशिक्षकही भरउन्हात आपल्या वर्गाला विजेतेपद मिळावे म्हणून झटताना दिसत होते. प्रत्येक तुकडीतील विद्यार्थी आपापल्या वर्गातील संघासाठी, खेळाडूंसाठी चिअर अप करीत होते. घोषणा देणे, वाकुल्या दाखविणे आणि जोरजोरात आरोळ्या ठोकून प्रेक्षक विद्यार्थी या स्पर्धा अधिकच चुरशीच्या करीत होते.
इयत्ता सहावीतील अ, ब, क आणि ड तुकड्यांतील विद्यार्थ्यांत धावण्याची स्पर्धा सुरू होणार होती. पीटीचे शिक्षक शेळके सर स्पर्धकांना नियम समजावून सांगत होते. सहावी अ मधील रोहित आणि मनोज नावाचे दोन्हीही आपापल्या तुकडीतील मित्रांना प्रोत्साहन देण्यासाठी जोरजोरात ओरडत होते.
दोघांत मैदानात गप्पाही रंगल्या होत्या. मनोज रोहितला म्हणाला, “”रोह्या तू एवढा उंच आणि काटक आहेस तू धावण्याच्या शर्यतीत भाग घ्यायला हवा होता.”त्यावर रोहित म्हणाला, “”हो रे मन्या, तसं पाहता माझं रनिंग चांगलं आहे, पण मी भाग नाही घेऊ शकत यार.”
मनोज म्हणाला, “”का रे, तुला कोणी अडवतं का?”
रोहित म्हणाला, “”नाही रे! मी दुसरीत असताना खेळताना माझा पाय मोडला होता.”
मनोज म्हणाला, “”मग, तुला डॉक्टरांनी सांगितले का, की धावू नकोस म्हणून.”
रोहित म्हणाला, “”नाही रे! त्यांनी उलट मला नियमित व्यायाम करायला सांगितले होते.”
मनोज म्हणाला, “”मग तू धावण्याच्या शर्यतीत भाग का नाही घेत?”
रोहित म्हणाला, “”ते लागल्यापासून धावताना मला कधी कधी पायात दुखल्यासारखे वाटते, म्हणून मी धावणे सोडूनच दिले आहे.”या दोघांच्या गप्पा सुरू असतानाच अचानक पाठीमागून काही मुलांचा किंचाळण्याचा आवाज आला. या दोघांनी मागे पाहिले तर काय काही मुले, पळा… पळा… बैल उधळला आहे, म्हणत मैदानाबाहेर धावताना दिसत होती. मैदानाशेजारच्या शेतातील बैल सैरभैर धावताना दिसल्याने सर्वच मुले मैदानाबाहेर धावू लागली. मनोज आणि रोहितनेही तिथून धूम ठोकली.
जो तो शाळेच्या इमारतीच्या दिशेने धावत होता आणि काय आश्चर्य पाय दुखतो म्हणून धावणे टाळणारा, रोहित आता मात्र सुसाट धावत होता. तो धावण्याच्या स्पर्धेतील स्पर्धकांना मागे टाकत सर्वात अगोदर शाळेच्या गेटजवळ पोहोचला. रोहितच्या या धावण्याने मनोज आणि शिक्षकही अचंबित झाले. वेदनेचे कारण देत धावण्याच्या स्पर्धेपासून स्वतःला अलिप्त ठेवणाऱ्या रोहितने एका अर्थाने अनौपचारिक स्पर्धा जिंकली होती. कुत्रा मागे लागल्यासारखे धावणे, असाच काहीसा प्रकार घडला होता. असे का बरं झाले असेल?
उत्तर अगदी सोपे होते. मनाने घातलेली स्व-मर्यादेवर रोहितने केलेली मात.
मी अमुक करू शकत नाही..!
मला हे कधीच जमणार नाही..!
मला हे येत नाही… किंवा मी हे कधी केलेच नाही!
अशा एक ना अनेक मर्यादा आपण मनाने आपल्या स्व भोवती आखत असतो. परिणामी अशक्य शक्य करण्याचे प्रचंड सामर्थ्य असूनही आपण अगदी किरकोळ गोष्टींपासूनही दूर पळत असतो. या स्व-मर्यादाच आपल्याला आपल्या यशापासून दूर ठेवत असतात.
आपण हत्तीची गोष्ट ऐकली आहे. तसे पाहता हत्ती हा जंगलातील सर्वांत बलाढ्य प्राणी. याच हत्तीचे पिलू जेव्हा सर्कशीत आणले जाते तेव्हा त्याच्या पायाला एका सध्या साखळीने बांधले जाते, तो ती साखळी तोडून जंगलात जाण्यासाठी खूप प्रयत्न करतो, पण त्याची ताकद कमी पडते, तो सतत प्रयत्न करत असतो कारण त्याचा तसा समज असतो की तो ती साखळी तोडू शकतो.
पण कालांतराने, जेव्हा ती साखळी तुटत नाही, तेव्हा त्याचा असा विश्वास होतो की, आपण आपल्या पायाला बांधलेली साखळी तोडू शकत नाही. पुढे हत्ती मोठा होतो, तरीही माहूत त्याला तीच साखळी रोज पायाला बांधत असतो. आता हत्ती तशा दहा साखळ्याही तोडू शकतो, एवढी ताकद असूनही तो त्याच्या मनाच्या स्व मर्यादांचे बंधनात असतो. यातून आपण ती साखळी तोडू शकत नाही हा त्याचा अगोदरचा विश्वास ठाम बनतो. बऱ्याच गोष्टींबाबत आपलीही अवस्था अशीच काहीशी असते. आपणच आपल्या मनाला घालून दिलेल्या स्व-मर्यादा या आपल्या स्व-सामर्थ्याला झाकोळत असतात.
अनेक चांगले-वाईट समज, विश्वास आणि समजुती या कळत नकळत आपल्या मनात मर्यादा निर्माण करत असतात. म्हणूनच ज्या दिवशी आपण या घातक स्व-मर्यादांना ओलांडू त्या दिवसापासून यशाचा प्रवास नक्कीच सुरू होणार.
व्यक्तिमत्त्व
-सागर ननावरे