“जिया बेकरार है’, किंवा “प्यार किया तो डरना क्या’ वा एखादे भक्तिगीत जोराने हेल काढून म्हणत, गळ्यातील झोळीत छोटे मूल, हातात सिरॅमिकच्या खापराचे जोड व आणखीन एक मूल हातात स्टिलचा ग्लास घेऊन प्रत्येकापाशी जाऊन भीक मागत आहे, हे मुंबईतील लोकलमध्ये हमखास दिसणारे चित्र. विविध भीक मागण्याच्या मार्गांपैकी अधिक असणारे. पुण्यातील सिग्नलला तर हे चित्र कायमचेच आहे. एकंदरीत या भिकाऱ्यांनी नको केले आहे व ही एक सामाजिक समस्या आहे, असे मानणारे अनेक जण आहेत. मलाही तसेच वाटते, पण मी थोड्या वेगळ्या अंगाने त्याकडे पाहात आहे.
आज मुंबई, पुणे वा सर्वत्र भिकारी खूप वाढलेले आढळतात. फक्त मुंबईत त्यांची संख्या काही लाखांत आहे. वर्षभरात हे लोक करोडो पैसे मिळवतात. गिरणी कामगारांना दहा कोटींच्या बोनसची बातमी छापली जाते. त्यामुळे वाचणाऱ्यास कामगार करोडपती नाही तर लखपती होत असतील असे वाटते, पण प्रत्यक्षात तो सर्व गिरण्यांचा एकत्रित आकडा दिलेला असतो. हे भिकारी मुख्यत: देवस्थाने, सार्वजनिक ठिकाणे, एसटी बस व रेल्वे स्थानके येथे जास्त प्रमाणात आढळतात. वेगवेगळ्या जत्रा किंवा विशिष्ट सणांच्या वेळेला त्या त्या मंदिरांच्या भोवती आढळतात.
आता ते भीक का मागतात, हा प्रश्न पडतो पण उत्तरही समोरच मिळते. प्रचंड लोकसंख्या, अशिक्षित, गरिबी व बेकारी. कित्येक वेळी देवळासमोरील भिकाऱ्यांत प्रामुख्याने लुळेपांगळे, अंध असे जास्त असतात. कित्येकांना विशेषतः वृद्धांना घरातून बाहेर काढल्याने ते भीक मागताना दिसतात. काही साधू बनून येतात व काही धूप जाळून आपल्या घरात वा दुकानात धूर सोडून काही बडबड करून पैसे मागतात. कित्येक वेळेला गजबजलेल्या ठिकाणी किंवा सिग्नलच्या ठिकाणी तृतीयपंथी भीक मागताना दिसतात. काही ठिकाणी तर ते सरळ सरळ पैशांची मागणी करतात. मुंबईत गेटवे सारख्या ठिकाणी सुंदर कपडे घातलेली व्यक्ती आपल्या पाशी येऊन “कॅन यू गिव्ह टेन रुपीज प्लीज’, असे मागतानाही आढळते. एकंदरीत सर्वच ठिकाणी कमीजास्त फरकाने हाच अनुभव असतो. बरे हे भिकारी सर्वच धर्मातील असतात. गरिबी, बेकारी ही मुख्य कारणे आहेत व सरकार कितीही म्हणाले, एवढे लाख रोजगार देऊ वा दिले, तरी त्यात काही तथ्य नसल्यासारखेच जाणवते.
सध्याच्या काळात ही परिस्थिती अधिक गंभीर झालेली आहे. कित्येक वेळेला काही भिकारी मग वाम मार्गाचा अवलंब करूनही पैसे कमावण्याचा प्रयत्न करतात. मग कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न येतो. फसवाफसवी, चोरीमारी यात वाढ होते. कित्येकांच्या बाबतीत भीक हा अंतिम मार्ग स्वीकारला, असे म्हणतात. आता हे भिकारी गेले पाहिजेत हे सर्वांनाच वाटत असते, पण आपणच त्यांना भीक देतो. मीही त्यांना भीक देत नाही असे नाही, पण मी खिशात सुट्टे पैसे असतील तर लुळे पांगळे वा अंध अशाच भिकाऱ्यांना देतो. कारण नाही म्हटलं तरी कष्ट करून कमवण्यात ते इतरांपेक्षा नक्कीच कमी पडतात, पण कष्ट करू शकतात पण तरीही भीक मागतात अशांना मी कधीही भीक घालत नाही. तरीही एकंदरीत असेही भीक मागणारे वाढलेले आहेत. वर लिहिल्याप्रमाणे कष्ट करण्याची क्षमता असूनही भीक मागणारे छोट्या मुलांनाही त्याच मार्गावर नेतात व त्यांच्या दृष्टीने जास्त मुले म्हणजे भीक मागणारे जास्त हात, त्यामुळे त्यांची संख्या वाढते.
मला असे वाटते, प्रत्येकाने म्हणजे जे भिकाऱ्यांना पैसे देतात त्यांनी किमानपक्षी ते कमविण्यास असमर्थ आहेत अशांनाच पैसे द्यावे, पण जे धडधाकट आहेत व काम करू शकतात अशांना चुकूनही मुळीच भीक घालू नये. नाहीतर असे भिकारी वाढतच जाणार व ते नवी भिकाऱ्यांची पिढी घडवत जाणार.
प्रत्येकाने याचा जरूर विचार करावा. जाणता-अजाणता आपणच भिकारी निर्माण करत असतो व त्यांना पोसत असतो कारण “बेगर्स बेग बिकॉज दे गेट’.
भिकारी भीक मागतात, कारण त्यांना ती मिळते.
मागोवा
उत्तम पिंगळे