दुबई – जसप्रित बुमराह आणि ट्रेन्ट बोल्ट यांच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर मुंबई इंडियन्सने दिल्ली कॅपिटल्सचा 57 धावांनी पराभव केला. या विजयामुळे मुंबईने यंदाच्या आयपीएल स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. हा सामना गमावल्यानंतरही दिल्लीला अंतिम फेरी गाठण्यासाठी आणखी एक सामना खेळण्याची संधी मिळणार आहे.
विजयासाठी 201 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना दिल्लीचा डाव 20 षटकांत 8 बाद 143 धावा असा रोखला गेला. दिल्लीच्या पृथ्वी शॉ, शिखर धवन आणि अजिंक्य रहाणे यांना भोपळाही फोडता आला नाही. बोल्टने पहिल्या षटकातील दुसऱ्या चेंडूवर शॉला तर पाचव्या चेंडूवर रहाणेला बाद करत थाटात सुरुवात केली.
दुसऱ्या बाजूने बुमराहने शिखर धवनचा त्रिफळा उडवत दिल्लीची अवस्था 3 बाद 0 अशी दयनीय केली. त्यानंतर दिल्लीकडून मार्कस स्टोनिसने 65 धावांची तर अक्सर पटेलने 42 धावांची खेळी करूनही त्यांना संघाचा पराभव टाळता आला नाही. बुमराहने 4 तर बोल्टने 2 गडी बाद केले. कृणाल पंड्या व कॅरन पोलार्ड यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.
तत्पूर्वी, इशान किशन, सूर्यकुमार यादव, कॉन्टन डीकॉक व हार्दिक पंड्या यांच्या आक्रमक फलंदाजीच्या जोरावर प्ले-ऑफमधील क्वालिफायर सामन्यात मुंबई इंडियन्सने दिल्ली कॅपिटल्ससमोर धावांचा डोंगर उभा केला.
दिल्लीचा कर्णधार श्रेयस अय्यर याने फलंदाजीसाठी नंदनवन ठरत असलेल्या खेळपट्टीवर नाणेफेक जिंकत मुंबईला फलंदाजी दिली. याच निर्णयापासूनच त्यांचे ग्रह फिरले. सलामीवीर कर्णधार रोहित शर्मा भोपळाही न फोडता बाद झाल्यानंतर डीकॉक व सूर्यकुमार यांनी मुंबईचा डाव सावरला. या जोडीने दुसऱ्या गड्यासाठी 62 धावांची भागीदारी केली.
मोहितला पितृशोक
दिल्लीचा खेळाडू मोहित शर्मा याच्या वडिलांचे बुधवारी रात्री निधन झाले. त्यामुळे मोहित मायदेशी परतला. त्याच्या वडिलांना श्रद्धांजली वाहताना दिल्लीच्या खेळाडूंनी काळी फित लावून या सामन्यात खेळ केला. यंदाच्या स्पर्धेत मोहितला केवळ किंग्ज इलेव्हन पंजाब विरुद्धच्याच सामन्यात संधी मिळाली होती.
डीकॉक स्थिरावल्यानंतरही अनावश्यक फटका मारून 40 धावांवर बाद झाला. त्यानंतर सूर्यकुमारने आपले अर्धशतक पूर्ण करताना किशनच्या साथीत संघाचे शतक फलकावर लावले. सूर्यकुमारही अर्धशतकी खेळीनंतर लगेचच बाद झाला.
त्यावेळी भरवशाचा कॅरन पोलार्ड व कृणाल पंड्या यांनी निराशा केली. त्यावेळी मुंबईचा संघ दीडशतकी मजल तरी मारणार का, अशी स्थिती निर्माण झाली होती. 17 व्या षटकात त्यांची 5 बाद 140 अशी स्थिती निर्माण झाली होती. मात्र, किशनच्या साथीला पंड्या खेळपट्टीवर आला आणि संपूर्ण डावाचे चित्रच बदलले.
या जोडीने दिल्लीच्या गोलंदाजीची वाताहत केली. त्यांनी सहाव्या गड्यासाठी 23 चेंडूत 50 धावांची अभेद्य भागिदारी करत संघाला द्विशतकी धावसंख्या उभारून दिली. किशननेही आपले अर्धशतक पूर्ण केले. त्याने 30 चेंडूत 4 चौकार व 3 षटकारांच्या मदतीने नाबाद 55 धावांची खेळी केली.
पंड्याने वादळी फलंदाजी करताना केवळ 14 चेंडूत तब्बल 5 षटकार फटकावताना नाबाद 37 धावा केल्या. दिल्लीकडून रवीचंद्रन अश्विन सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला. त्याने 4 षटकांत केवळ 29 धावा देताना 3 गडी बाद केले. अनरिच नोर्जे व मार्कस स्टोनिस यांनी प्रत्येकी एक बळी मिळवला. दिल्लीचा स्टोनिस या सामन्यात सर्वात महागडा गोलंदाज ठरला. त्याच्या 4 षटकांत मुंबईने तब्बल 50 धावा काढल्या.
धावफलक –
मुंबई इंडियन्स – 20 षटकांत 5 बाद 200 धावा. (कॉन्टन डीकॉक 40, सूर्यकुमार यादव 51, इशान किशन नाबाद 55, हार्दिक पंड्या नाबाद 37, रवीचंद्रन अश्विन 4-29, मार्कस स्टोनिस 1-5, अनरिच नोर्जे 1-50). दिल्ली कॅपिटल्स – 20 षटकांत 8 बाद 143 धावा. (मार्कस स्टोनिस 65, अक्सर पटेल 42, जसप्रित बुमराह 4-14, ट्रेन्ट बोल्ट 2-9, कृणाल पंड्या 1-22, कॅरन पोलार्ड 1-36).