Revanth Reddy – कॉंग्रेस नेते अनुमूल रेवंत रेड्डी ( Revanth Reddy ) यांनी आज म्हणजे गुरूवारी तेलंगणा या राज्याचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. तेलंगणा विधानसभेच्या ११९ पैकी ६४ जागा जिंकत कॉंग्रेसने स्पष्ट बहुमत प्राप्त केले आहे. कॉंग्रेसच्या या विजयामुळे भारत राष्ट्र समितीचे के. चंद्रशेखर राव यांची राज्यातील दहा वर्षांची सत्ता संपुष्टात आली आहे.
यंदाच्या विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेसने रेवंत रेड्डी यांना कामरेड्डी आणि कोडंगल अशा दोन मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरवले होते. यातील कामरेड्डी येथून रेवंत यांचा पराभव झाला, मात्र कोडंगल येथून ते राज्य विधानसभेवर पोहोचले आहेत आणि आता राज्याच्या मुख्यमंत्रिपदाची कमान त्यांच्या हाती सोपवण्यात आली आहे.
१७ वर्षांच्या आपल्या राजकीय कारकीर्दीत रेवंत यांनी आतापर्यंत जिल्हा परिषद सदस्य, त्यानंतर आमदार, खासदार आणि आता मुख्यमंत्री असा प्रवास केला आहे. रेड्डी स्थावर आणि जंंगम मिळून ३० कोटींच्या संपत्तीचे मालक आहेत. त्यांच्या इन्कम टॅक्स रिटर्ननुसार २०२२-२३ या वर्षात त्यांचे उत्पन्न १३,७६,७०० रूपये होते. तर २०२१-२२ या आर्थिक वर्षात त्यांचे उत्पन्न १४,३१,५८० होते.
रेड्डी यांची चल संपत्ती २,१८,९३,३४३ इतकी दर्शवण्यात आली आहे तर त्यांची पत्नी गीता यांची चल संपत्ती २,९२,६८,००९ इतकी दर्शवण्यात आली आहे. यात कार, बॉंड, शेअर्स, बँकेतील ठेवी आणि दागिने आदींचा समावेश आहे. याखेरीज रेड्डींची अचल मालमत्ता ८,६२,३३,५६७ इतकी आहे तर त्यांच्या पत्त्नीची अचल संपत्ती १५,०२,६७,२२५ रूपये इतकी आहे. यात जमीन, शेतजमीन आणि घरांचा समावेश आहे. १,९०,२६,३३९ रूपये कर्ज त्यांच्यावर आहे.
८९ गुन्हे दाखल…
रेवंत रेड्डी यांच्या विरोधात ८९ गुन्हे दाखल आहेत मात्र अद्याप एकाही प्रकरणात त्यांना दोषी ठरवण्यात आलेले नाही. यातील ३४ प्रकरणे भारतीय दंड संहितेच्या कलम ५०६ नुसार दाखल आहेत तर ३८ प्रकरणे ५०४ नुसार दाखल आहेत.
शांतता भंग करण्याच्या दृष्टीने जाणीवपूर्वक कृती केल्याशी संबंधित ही प्रकरणे आहेत. त्यांच्या विरोधातील २१ प्रकरणे कलम १५३ नुसार दाखल आहेत. त्यात दंगल भडकवण्याच्या दृष्टीने जाणीवपूर्वक चिथावणी देणे आदी आरोप त्यांच्यावर आहेत. अन्य काही गुन्हेही त्यांच्या विरोधात दाखल आहेत.
कॉलेज जिवनापासून राजकारणात…
रेवंत रेड्डी कॉलेजच्या जिवनापासून राजकारणात सक्रिय आहेत. त्या काळात ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेत काम करत होते. २००१-२००२ मध्ये ते के. चंद्रशेखर राव यांच्या तेलंगणा राष्ट्र समितीमध्ये दाखल झाले. २००६ मध्ये त्यांनी चंद्राबाबू नायडू यांच्या तेलगु देसम पक्षाचा हात धरला.
तेलगु देसमच्या तिकीटावरच ते पहिल्यांदा विधानसभेची निवडणूक लढले आणि त्यात विजयी झाले. २०१७ मध्ये त्यांनी तेलगु देसम पक्षाला रामराम केला आणि कॉंग्रेसमध्ये दाखल झाले. २०१८ मध्ये कॉंग्रेसच्या तिकिटावर ते विधानसभेची निवडणूक लढले मात्र त्यात पराभूत झाले. मात्र २०१९ मध्ये कॉंग्रेसकडूनच ते मल्काजगिरी येथून लोकसभेवर निवडून गेले.