लखनौ- महाराष्ट्रातील 800 स्थलांतरित कामगारांना घेऊन जाणारी विशेष रेल्वे आज उत्तर प्रदेशात लखनौला जाऊन पोचली आहे. महिन्याभरापूर्वी लॉकडाऊनमुळे महाराष्ट्रात ठिकठिकाणी अडकून पडलेले हे स्थलांतरित कामगार आपापल्या घरी पोहोचले आहेत. लॉकडाऊनमुळे अडकून पडलेले स्थलांतरित कामगार, यात्रेकरू, पर्यटक, विद्यार्थी आणि अन्य नागरिकांना मूळ गावी परत पोहोचवण्यासाठी श्रमिक विशेष रेल्वे सोडायला सुरुवात झाली आहे. स्थलांतरितांसाठीची पहिली रेल्वे शुक्रवारी हैदराबादेवरून झारखंडसाठी रवाना झाली होती.
उत्तर प्रदेशात लखनौसाठी जाणारी रेल्वे शनिवारी नाशिकवरून रवाना झाली आणि 24 तासांचा प्रवास करून आज पहाटेच्या सुमारास लखनौला पोचली. त्यावेळी रेल्वे पोलीस, उत्तर प्रदेश पोलीस आणि आरोग्य कर्मचारी मोठ्या संख्येने प्लॅटफॉर्मवर उपस्थित होते. या प्रवाशांसाठी प्लॅटफॉर्मवर प्रवाशांनी सोशल डिस्टन्सिंग पाळावे, याची अव्याहत अनाउन्समेंट केली जात होती. या सर्व प्रवाशांनी वैद्यकीय तपासणी झाल्यानंतर त्यांना प्लॅटफॉर्मवरच खाद्यपदार्थांची पाकिटे दिली गेली आणि बाहेर उभ्या असलेल्या उत्तर प्रदेश राज्य परिवहन महामंडळाच्या बसमधून त्या सर्वांची रवानगी त्यांच्या घराकडे करण्यात आली.
उत्तर प्रदेश राज्य रस्ते परिवहन महामंडळाने राज्यातील सर्व जिल्ह्यांतील प्रवाशांना त्यांच्या गावी पोहोचवण्यासाठी 32 बस तैनात केल्याचे, लखनौ डेपोचे क्षेत्रीय व्यवस्थापक पीके बोस यांनी सांगितले. या बसमधून एकूण 841 प्रवासी सिद्धार्थनगर, श्रावस्ती, कन्नौज आणि बहराइच इथे आपापल्या घरी रवाना झाले.
या रेल्वेतून प्रवास करणारे अनेक प्रवासी आपापल्या घरी पोहोचण्यासाठी खूप उत्सुक होते. गेल्या महिन्याभरापासून अनिश्चिततेच्या वातावरणात राहिल्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावर घरी पोहोचण्याचा आनंद स्पष्ट दिसत होता. त्यांच्या चेहऱ्यावरच्या भावना स्थानिक वार्ताहर आणि छायाचित्रकारांनी अलगद टिपल्या.
शुक्रवारी उत्तर प्रदेशातील 5 हजार स्थलांतरित मजूर मध्यप्रदेशातून 155 बसमधून रवाना झाले. तर मूळचे मध्यप्रदेशातील 1,341 कामगारांना उत्तर प्रदेशातून रवाना करण्यात आले. दिल्लीमधील तब्बल 4 लाख आणि हरियाणातील 12 हजार कामगारही उत्तर प्रदेशात पोहोचले आहेत.