नवी दिल्ली – केंद्र सरकारच्या ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ या मोहिमेत प्रत्यक्ष योजनेपेक्षा जाहिरातींवर अफाट खर्च होत आहे. त्यावर एका संसदीय समितीनेही सरकारला हा जाहिरातींवरील खर्च कमी करण्याची सूचना केली आहे. त्या अनुषंगाने राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. त्यांनी म्हटले आहे की हा बेटी बचाओ, बेटी पढाओ कार्यक्रम नाही तर तो सरकारची छवी बचाओ, फोटो छपाओ कार्यक्रम आहे.
संसदेच्या महिला सक्षमीकरणाच्या समितीने या योजनेत जाहिरातींवर खर्च करण्यापेक्षा मुलींच्या शिक्षण आणि आरोग्यावर लक्ष देण्याची गरज व्यक्त करण्यात आली आहे. या विषयीची बातमी राहुल गांधी यांनी ट्विटरवर प्रसारित केली असून त्यावर राहुल गांधी यांनी भाजप का असली नारा, छवी बचाओ, फोटो छपाओ असे असल्याचे म्हटले आहे.
बेटी बचाओ योजनेसाठी केंद्र सरकारने सन 2016 ते 2019 या काळात एकूण 446 कोटी 72 लाख रुपयांचा निधी खर्च केला आहे त्यातील तब्बल 79 टक्के निधी हा केवळ जाहिरातींवर खर्च झाला आहे. संसदीय समितीने या खर्चावर नाराजी व्यक्त केली आहे.