मुंबई – काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सुरु केलेल्या ‘भारत जोडो’ यात्रेला ठिकठिकाणी चांगला प्रतिसाद मिळत आहे. भारत जोडो यात्रा आता महाराष्ट्रात दाखल होणार असल्यामुळे काँग्रेसने या यात्रेसाठी जोरदार तयारी सुरु केली आहे.राज्यात होणाऱ्या आगामी निवडणुकांच्या टृष्टीने आणि काँग्रेसच्या अस्तित्वाच्या लढाईसाठी ही यात्रा महत्वाची ठरणार आहे. महाराष्ट्रात ही यात्रा सुरु होण्यापूर्वी भाजप नेत्याने या यात्रेबाबत टोलेबाजी केली आहे.
गेल्या काही दिवसांपासून राज्यातील काँग्रेस नेते विविध पक्षांच्या नेत्यांना यात्रेत सामील होण्यासाठी निमंत्रण देत आहेत. ज्यात महाविकास आघाडीतील नेत्यांचा देखील समावेश आहे. भाजप नेते अतुल भातखळकर यांनी भारत जोडो यात्रेवरून आता थेट राहुल गांधींवर निशाणा साधला आहे. “तारक मेहताचा टीआरपी पण कमी होईल, सर्वोत्कृष्ट निखळ मनोरंजन येते आहे…” अशा आशयाचे ट्विट भातखळकर यांनी केलं आहे.
महाराष्ट्रात भारत जोडो यात्रेचे १४ मुक्काम, १० कॉर्नर सभा, तर दोन भव्य सभा देखील होणार आहेत.राहुल गांधींचे नांदेडमधील देगलूर येथे आगमन होणार आहे तिथून ते पुढील यात्रेसाठी मार्गस्त होतील. काँग्रेस नेत्यांच्या तयारीनंतर महाविकास आघाडीतील कोणते कोणते नेते या यात्रेत राहुल गांधींसोबत दिसणार याकडे अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागून आहे.