ढाका – भारत हा बांगलादेशचा खरा मित्र आल्याचे प्रतिपादन बांगलादेशाच्या पंतप्रधान शेख हसिना यांनी केले आहे. पाकिस्तानविरोधात 1971 साली झालेल्या स्वातंत्र्ययुद्धाच्यावेळी केलेल्या मदतीबद्दल त्यांनी भारताचे आभारही मानले आहेत. भारत आणि बांगलादेशादरम्यान आज 7 करारांवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या.
त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबरोबरच्या आभासी परिषदेमध्ये बोलताना हसिना यांनी या भावना व्यक्त केल्या. स्वातंत्र्याच्या महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा एकदा भेटल्याबद्दल आपल्याला आनंद झाल्याचेही त्या म्हणाल्या.
पाकिस्तानकडून बांगलादेशला स्वातंत्र्य मिळाल्याला बुधवारी 49 वर्षे पूर्ण झाली. बांगलदेशाने भारताच्या मदतीने 16 डिसेंबर 1971 रोजी पाकिस्तानविरोधातल्या युद्धात विजय मिळवला होता. स्वातंत्र्ययुद्धातील या विजयाचे स्मरण म्हणून बांगलादेशमध्ये संपूर्ण डिसेंबर महिना आनंदोत्सव साजरा केला जातो.
याच महिन्यात बांगलादेशचे राष्ट्रपिता बंगबंधू शेख मुजीबुर रेहमान यांच्या प्रती प्रत्येक बांगलादेशी नागरिक कृतज्ञता व्यक्त करत असतो. त्यांच्याच नेतृत्वाखाली बांगलादेशाने स्वातंत्र्य मिळवले होते.
या स्वातंत्र्ययुद्धातील 30 लाख शहिदांप्रती आणि भारतीय लष्करातील हुतात्म्यांना आपली श्रद्धांजली आहे आणि त्यांच्या कुटुंबीयांप्रती आपल्या सहवेदनाही आहेत, असेही शेख हसिना म्हणाल्या. बांगलादेशच्या स्वातंत्र्याला मोकळेपणाने पाठिंबा देणारे भारत सरकार आणि भारतीय नागरिकांबद्दल आपल्या मनात कृतज्ञता आहे.
या स्वातंत्र्ययुद्धामध्ये महत्वाची मदत करणारा भारत हा बांगलादेशचा खरा मित्र आहे, असेही हसिना म्हणाल्या. करोनाच्या साथीला रोखण्यासाठी भारताने केलेल्या उपाय योजनांचेही हसिना यांनी कौतुक केले.
तर शेजारी राष्ट्रांशी सौहार्दपूर्ण संबंध प्रस्थापित करत शेजारधर्म जपण्याच्या भारताच्या धोरणात, बांगलादेशचं स्थान महत्त्वपूर्ण असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी सांगितले. करोनाच्या साथीच्या काळात औषधे, वैद्यकीय सामग्री, वैद्यकीय कर्मचारी अशा अनेक पातळ्यांवर दोन्ही देशात सहकार्य करण्यात आले आणि आता करोनावरील लस उपलब्ध होईल, तेव्हाही हे सहकार्य कायम राहील असे मोदी म्हणाले.
भारत-बांगलदेश दरम्यानची रेल्वे पुन्हा सुरू
भारत आणि बांगलादेशंदरम्यान 1965 पर्यंत सुरू असलेली रेल्वे पुन्हा सुरू करण्यासाठीच्या करारावरही यावेळी स्वाक्षऱ्या केल्या गेल्या. या रेल्वे सेवेच्या निमित्ताने 55 वर्षांच्या खंडानंतर भारत आणि बांगलादेशमध्ये रेल्वे संपर्क सुरू होत आहे.
1965 मध्ये झालेल्या भारत पाक युद्धाच्या वेळी, ही रेल्वेसेवा खंडित करण्यात आली होती. चीलाहाटी-हल्दीबारी रेल्वेमुळे भारतातील आसाम आणि पश्चिम बंगाल ही राज्य बांगलादेशशी जोडली जाणार आहेत.