कानडी-जिल्हे म्हैसूरमध्ये सामील करून नवकर्नाटक राज्य स्थापना
संयुक्त कर्नाटकबाबतची नवी योजना
पुणें, ता. 11 : मुंबई राज्यातील कानडी-भाषी जिल्हे म्हैसूर राज्यांत समाविष्ट करून ताबडतोब कर्नाटक राज्य स्थापन करावे असें मत काल येथे भरलेल्या मुंबई राज्यातील कानडी-भाषी आमदाराचे सभेत व्यक्त करण्यांत आले.
वादग्रस्त प्रदेश
वरीलप्रमाणे कर्नाटक राज्य स्थापन करून इतर वादग्रस्त भागांचा निर्णय भारत सरकारतर्फे नेमण्यांत येणाऱ्या सरहद्द बाबी विषयक उच्चाधिकार समितीने घ्यावा आणि हैद्राबादमधील कानडी-भाषी मुलखाबाबत तोपर्यंत घाई करू नयें असेंही मत व्यक्त करण्यात आलें.
शिष्टमंडळ नेहरूंना भेटणार
कर्नाटक राज्य स्थापना त्वरित करण्याबाबत पंडित नेहरूंना विनंती करण्यासाठी आणि ह्या प्रश्नांबाबत कन्नडभाषियांचे विचार त्यांचे पुढे मांडण्यासाठी एक शिष्टमंडळ लौकरच त्यांना भेटणार आहें.
महाराष्ट्रातील धरण योजनांसाठी उद्योगपतींकडून भांडवल घेणार
मुंबई सरकारची नवी योजना
पुणें, ता. 11 : मुंबई राज्यांतील मुळा, कुकडी, वीर आदि मोठ्या पाटबंधाऱ्याच्या योजना पूर्ण करण्यासाठी मुंबई सरकारचे प्रयत्न चालू असून त्यात त्यांना यश येईल असें दिसतें. ह्या पाटबंधाऱ्यांसाठी लागणारी रक्कम जमा करण्यासाठी एक पाटबंधारे फायनान्स कॉर्पोरेशन काढण्याच्या शक्यतेबाबत मुंबई सरकार प्रमुख उद्योगपतींशी वाटाघाटी करीत आहें असें खात्रीलायकरीत्या कळते.
पुरेसा पैसा नाहीं
ह्या योजनांची आवश्यकता आहे आणि त्या त्वरित अमलांत येणेंही जरुरीचे आहें ही गोष्ट मुंबई सरकारला पटली असली तरी आवश्यक तेवढा पैसा जवळ नसल्याने मुंबई सरकार हे कार्य पार पाडण्यास असमर्थ ठरले आहें. तेव्हा इरिगेशन (पाटबंधारे) फायनान्स काढून खासगी भांडवल जमा करून हे कार्य पार पाडावें अशी एक सूचना सरकारला करण्यांत आली होती आणि ह्या दृष्टीनेच सध्याच्या वाटाघाटी चालू आहेत असें समजते.