– तुषार हगारे
डिकसळ – राज्यात कोल्हापूर, सांगली जिल्ह्यात महापुराने थैमान घातले होते. मात्र, गेल्या तीन महिन्यांपासून पुणे जिल्ह्यातील इंदापूर, बारामती, दौंड तालुक्यातील अनेक भागात पाऊस झाला नाही. त्यामुळे शेती आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न जटील झाला आहे. 63 टीएमसी पाणी वाहून गेल्यानंतरही इंदापूरसह तीन तालुक्यांत पाण्यासाठी टाहो फोडण्याची वेळ केवळ राज्यकर्त्यांच्या निष्क्रिय धोरणांमुळे आली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांतून संतापाची लाट उसळली आहे.
इंदापूर तालुक्यातील तलाव भरण्यासाठी फक्त पाऊण टीएमसी पाण्याची गरज आहे. मात्र, खडकवासला धरणातून तलावांचे फिडिंग नसल्याचे कारण देत जलसंपदा विभागाचे अधिकारी तलावात पिण्यासाठी देखील पाणी सोडत नाहीत. दुसरीकडे उजनीतून अडिच टीएमसी पाणी उचलण्याची परवानगी असूनही उजनी भरल्यानंतर दरवर्षी पाणी कर्नाटकात वाहून जाते. मात्र, इंदापूर तालुक्यातील लोकांच्या जमीनी धरणात जाऊनही धरणग्रस्तांना पाण्याविना रहावे लागत आहे. उजनी धरणातून मागील 25 वर्षांपासून लाकडी, निंबोडी उचल पाणी योजनेसाठी परवानगी आहे. मात्र योजनेसाठी निधी दिला जात नसल्याने ही योजना फक्त कागदावरच आहे. पुणे शहराला 19 टीएमसी पाणी दिले जाते. प्रत्यक्ष 9 टीएमसी पाण्याची तरतूद असताना वाढीव पाणी दिले जात असल्याने ग्रामीण भाग दुष्काळी झाला आहे.
भादलवाडी, मदनवाडी, शेटफळ, पोंधवडी, कळस, तरंगवाडी तलावात पाणी नसल्याने कोरडा ठाक पडला आहे. त्यामुळे शेतकऱ्यावर पिण्याच्या पाण्यासह शेती सिंचनाचा गंभीर झाला आहे. जलसंपदा विभाग नदीद्वारे पाणी खाली सोडून वाया घालवत आहे. पण हेच वाया जाणारे पाणी कालव्याद्वारे सोडून तलाव भरले असते तर गावांना पाण्यासाठी वणवण करण्याची वेळच आली नसती, अशी खंत शेतकऱ्यांनी व्यक्त केली.
उशाला आणि पायथ्याला पाणीच पाणी, पण…
हातच सोडायंच आणि पळत्याच्या माग लागायचं, अशी वेळ इंदापूर तालुक्यातील जनतेवर आली आहे. उजनीच हक्काचे पाणी बोगद्याद्वारे मराठवाड्याला दिले अन खडवासलाच्या पाण्याकडे डोळे लावून बसायची वेळ आली आहे. इंदापूर तालुक्याला उशाला खडकवासला धरण तर पायथ्याशी उजनी धरण असतानाही पाणी मिळत नसल्याने ही विदारक निष्क्रिय राज्यकर्त्यांमुळे ओढावली आहे.