मुंबई : सॅनिटायझर प्यायल्याने 6 जणांना जीव गमवावा लागल्याची धक्कादायक घटना यवतमाळ जिल्ह्यात घडली. लॉकडाऊनसदृश निर्बंधांमुळे राज्यभरात काही दिवसांपासून मद्यविक्री बंद आहे.
त्यामुळे दारूची तलफ भागवण्यासाठी यवतमाळच्या वणीत राहणाऱ्या काही जणांनी शुक्रवारी रात्री सॅनिटायझर प्राशन केले. त्यानंतर त्यांना अस्वस्थ वाटू लागले. काहींना उलट्यांचा त्रास झाला. त्यामुळे त्यांना उपचारासाठी स्थानिक रूग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, सहा जणांचे प्राण वाचू शकले नाहीत. त्यातील तिघांचा मृत्यू सॅनिटायझर प्यायल्यानेच झाल्याच्या बाबीवर डॉक्टरांनी शिक्कामोर्तब केले.
मात्र, इतर तिघांचा अंत्यविधी पोलिसांना न कळवता झटपट उरकण्यात आला. त्यामुळे शवविच्छेदनाअभावी त्यांच्या मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट करण्यात आले नाही.