अकोले, श्रीरामपूर, कोपरगाव वगळता जिल्ह्यात टॅंकरसुरु
टॅंकरवर मे अखेर 46 कोटी खर्च
नगर – ऐन पावसाळ्यात जिल्ह्यातील अनेक टंचाई ग्रस्त गावातील नागरिकांची तहान भागविण्यासाठी जिल्ह्यात आज मितीस 564 टॅंकरद्वारे पाणी पुरवठा होत आहे. अकोले तालुका वगळता इतर तालुक्यांना पावसाची प्रतिक्षा असून, खरीप हंगामातील पिके धोक्यात आले आहेत. दिवसभर ढागाळ वातावरण असते. मात्र पाऊस नसल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे. मे अखेर पर्यंत टॅंकरवर टंचाई आराखडा निधीतून 46 कोटी रूपये खर्च झाले आहे.
ह्या खर्चात मोठी वाढ होण्याची शक्यता असून 55 कोटीपर्यंत खर्च होईल असेही सांगण्यात आले आहे. मागील चार दिवसापासून जिल्ह्याच्या शिवारात आभाळ भरून येत असताना बळावलेली तहान भागवण्यासाठी पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यासाठी जिल्हा प्रशासनाचे तब्बल 564 टॅंकर धावत आहेत. जिल्हा प्रशासनाच्या या टॅंकरद्वारे जिल्ह्यातील 456 गावे व 2 हजार 498 वाड्यावस्त्यांवरील 10 लाख 12 हजार 821 नागरिकांची तहान भागविली जात आहे.
जिल्ह्यामध्ये मागील वर्षी अल्प पाऊस पडल्यामुळे पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. ग्रामीण भागातील टंचाईग्रस्त गावांतील नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटावा, यासाठी जिल्हा प्रशासनाकडे टॅंकरची मागणी करणाऱ्या प्रस्तावाच्या संख्येत वाढ झाली. सध्या श्रीरामपूर, अकोले, कोपरगाव वगळता राहाता, नेवासे, संगमनेर, कोपरगाव, राहुरी, नगर, पारनेर, पाथर्डी, शेवगाव, कर्जत, जामखेड व श्रीगोंदा या बारा तालुक्यातील गावांना टॅंकरने पाणी पुरवठा करण्यात येत आहे. जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त टॅंकर हे पारनेर तालुक्यात सुरू आहेत. या तालुक्यात 86 टॅंकर, तर सर्वात कमी तीन टॅंकर हे राहुरी तालुक्यामध्ये सुरू आहेत.
2003 पासूनचा विचार करता गतवर्षी जिल्ह्यामध्ये सरासरीच्या तुलनेत सर्वात कमी पाऊस झाला. त्यामुळे भूगर्भातील जलस्तर कमालीचा घटला. त्यामुळे भर पावसाळ्याच्या दिवसात जिल्हा प्रशासनावर पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यासाठी टॅंकर सुरु करण्याची वेळ आली. टॅंकर सुरु करण्याचे अधिकार जिल्हाधिकारी स्तरावर होते. परंतु निर्माण झालेली परिस्थिती लक्षात घेऊन राज्य सरकारकडून टॅंकर मंजुरीचे अधिकार डिसेंबरच्या सुरुवातीस उपविभागीय अधिकाऱ्यांना प्रदान करण्यात आले होते.
तालुकानिहाय मे अखेर टॅंकर खर्च
संगमनेर-9 कोटी 40 लाख, अकोले-14 लाख 86 हजार, श्रीरमपूर-21 हजार, नेवासा-1 कोटी 10 लाख 28 हजार, नगर-4 कोटी, 30 लाख 28 हजार, पारनेर-12 कोटी 64 लाख, पाथर्डी-11 कोटी 3 लाख, शेवगाव -4 कोटी-27 लाख 91 हजार, कर्जत-4 कोटी, 97 लाख 98 हजार, जामखेड-3 कोटी 31 लाख 31 हजार, श्रीगोंदा-2 कोटी 41 लाख 26 हजार रुपये टंचाई आराखड्यातून मे अखेर पर्यंत खर्च झाला आहे.
तालुकानिहाय टॅंकर
पाथर्डी-75, पारनेर-86, जामखेड -57, कर्जत-78, श्रीगोंदे-62, नगर -41, शेवगाव-46, संगमनेर-36, नेवासे-38, राहाता-6, राहुरी-1