नवी दिल्ली – राजधानी दिल्लीत काल करोना लसीकरणाचा कार्यक्रम नियोजित वेळापत्रकानुसार पार पडला. परंतु त्यातील 51 जणांना या लसीची रिऍक्शन आली आहे. ही बाब गंभीर आहे असे दिल्लीचे आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन यांनी म्हटले आहे. दिल्लीत काल पहिल्या दिवशी 4319 जणांना ही लस देण्यात आली होती. त्यातील 51 जणांना त्रास जाणवू लागला.
तथापि हा त्रास अत्यंत किरकोळ स्वरूपाचा असला तरी एक जण मात्र गंभीररित्या आजारी पडला आहे. ज्याला हा गंभीर स्वरूपाचा त्रास झाला आहे तो इसम केवळ 22 वर्षीय असून तो सिक्युरिटी गार्ड म्हणून काम करीत आहे. काल रात्री त्याला दिल्लीच्या एका हॉस्पीटल मधील आयसीयु मध्ये दाखल करण्यात आले आहे. बाकीच्यांना मात्र रूग्णालयात दाखल करण्याची वेळ आली नाही. त्यांना केवळ काहीं वेळ निरीक्षणाखाली ठेवण्यात आले होते.
दिल्लीत काल पहिल्या दिवशी 8117 जणांची नावे लसीकरणासाठी निश्चीत करण्यात आली होती. पण त्यातील निम्मे लोकच प्रत्यक्ष लस घेण्यास आले होते. निम्मे लोक लस घेण्यास का आले नाहीत याचे एखादे निश्चीत कारण सांगता येत नाही असे सत्येंद्र जैन म्हणाले. ते म्हणाले की काही जणांनी अगदी आयत्यावेळी लस घेण्यास नकार दिला.
ही लस घेणे ऐच्छिक स्वरूपाचे आहे. त्यामुळे नाव नोंदवून जे लोक लस घेण्यास आले नाही त्यांच्यावर सक्ती करण्यात आली नाही असेही मंत्र्यांनी स्पष्ट केले.