पुणे – लॉकडाऊनमुळे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाची (एसटी) बससेवा बंद आहे. परिणामी राज्यभरातील सर्व फेऱ्या बंद असल्याने आतापर्यंत 500 कोटींचे नुकसान झाले आहे. त्यामुळे एसटीचा तोटा दिवसेंदिवस वाढत असल्याने महामंडळाने काही योजना बंद केल्यास फायदा होईल, अशी शक्यता जाणकार व्यक्त करत आहेत.
महाराष्ट्रात 17 हजार 500 बसेस विविध मार्गांवर धावतात. त्यापैकी सुमारे 1 हजार बसेस शिवशाहीच्या आहेत. मात्र, या बसेस निम्म्यादेखील भरत नाहीत. एका फेरीमागे शिवशाहीच्या बसला साधारणपणे 10 ते 12 हजार रुपये खर्च येतो. परंतु, उत्पन्न मात्र 6 हजारांच्या घरात असून खर्चदेखील भरून निघत नाही. ज्येष्ठांना सवलतीकरिता स्मार्ट कार्डची सक्ती केली असून, महामंडळाने खासगी कंपनीला हे कंत्राट दिले आहे. यासाठी दोन हजार रुपयांची शेकडो थम इम्प्रेशन मशीन विकत घ्यावी लागली. याचा आर्थिक भारही महामंडळानेच पेलला आहे.