मुंबई: राज्यात आजही करोनाबाधित रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज केलेल्या भाषणात संख्या वाढणार असल्याचे संकेत दिले होते. संख्या वाढणार असली तरी काळजीचं कारण नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले होते. राज्यात आज 3041 रुग्णांची भर पडली. त्यामुळे रुग्णांची एकूण संख्या ही 50,231 वर पोहोचली आहे. तर आज 58 जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे आतापर्यंत एकूण 1635 जणांचा मृत्यू झाला आहे. समाधानाची बाब म्हणजे राज्यात आतापर्यंत 14 हजार 600 जण करोनामुक्त होऊन घरी गेले आहेत.
मुंबईतल्या करोनाबाधितांची संख्या 30 हजार 542वर गेली आहे. त्यामुळे सरकारला चिंता असून ही वाढ रोखण्यावर सर्व लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे. आज ठाणे महापालिका क्षेत्रात 127 करोना पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे ठाणे महापालिका क्षेत्रात करोनाबाधितांची संख्या एकूण 2018 झाली आहे.
राज्यात आज 1196 करोना रुग्ण बरे झाले आहेत. त्यामुळे राज्यातील करोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या 14 हजार 600 एवढी झाली आहे. त्यामुळे राज्यात 33 हजार 988 करोना रुग्ण अद्याप उपचार घेत आहेत. आज दगावलेल्या रुग्णांमध्ये मुंबईत 39, पुणे व सोलापूरमध्ये प्रत्येकी 6, औरंगाबाद 4, तर लातूर, मीरा भाईंदर आणि ठाण्यातील प्रत्येकी एकाचा समाववेश आहे. मृतांमध्ये 34 पुरूष आणि 24 महिलांचा समावेश आहे.