सातारा -केंद्र शासनाच्या पंचायत राज मंत्रालयाने दीनदयाळ पंचायत सशक्तीकरण पुरस्काराची घोषणा केली आहे. या पुरस्कारासाठी राज्यात सातारा जिल्हा परिषदेची निवड झाली असून जिल्हा परिषदेला 50 लाख रुपयांचा पुरस्कार मिळणार आहे. खटाव तालुक्यातील खटाव व माण तालुक्यातील इंजबाव या दोन ग्रामपंचायतींनी सर्वसाधारण प्रवर्गामध्ये राज्यस्तरावरील उत्कृष्ट ग्रामपंचायतींच्या यादीमध्ये स्थान पटकावले आहे. दोन्ही ग्रामपंचायतींना प्रत्येकी आठ लाख रुपये पुरस्कारांची रक्कम मिळणार आहे.
केंद्र शासनाने दीनदयाळ उपाध्याय पंचायत सशक्तीकरण पुरस्कारासाठी 100 गुणांची प्रश्नावली निश्चित केली आहे. प्रश्नावलीतील स्वच्छता, नागरी सुविधा, नैसर्गिक साधनसंपत्तीचे व्यवस्थापन, ई गव्हर्नन्स आदी क्षेत्रांमध्ये ग्रामपंचायतींनी केलेल्या कामाचे ग्रामपचायतीमार्फत स्वयंमूल्यांकन करण्यात आले. प्रश्नावली ऑनलाईन भरल्यानंतर पंचायत समितीकडे पाठवण्यात आली. पंचायत समितीने सर्वोत्कृष्ट ग्रामपंचायतीचे नामांकन जिल्हा परिषदेकडे व जिल्हा परिषदेने शासनास ऑनलाइन नामांकन पाठवले.
त्यानुसार शासनाने विभागीय आयुक्त स्तरावरुन नेमण्यात आलेल्या पुणे जिल्हा परिषदेच्या पथकामार्फत मार्च 2020 च्या पहिल्या आठवड्यात तपासणी केली. या पथकाच्या मूल्यांकनानुसार राज्य शासनाने केंद्र शासनास केलेल्या शिफारशीमधून महाराष्ट्रातून सातारा जिल्हा परिषदेची निवड झाली. जिल्हा परिषदेस 50 लाखांचा पुरस्कार
मिळणार असून खटाव आणि इंजबाव ग्रामपंचायतीस प्रत्येकी आठ लाखांचा पुरस्कार मिळणार आहे. सातारा जिल्हा परिषदेचे अध्यक्ष उदय कबुले, उपाध्यक्ष प्रदीप विधाते, सभापती मानसिंगराव जगदाळे, मंगेश धुमाळ, सौ. सोनाली पोळ व सौ. कल्पना खाडे, मुख्य कार्यकारी अधिकारी संजय भागवत, मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष धोत्रे, मनोज जाधव व अविनाश फडतरे आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या एकत्रित प्रयत्नांमुळे जिल्हा परिषदेची राज्यात निवड झाली. खटाव आणि इंजबाव ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरंपच, ग्रामसेवक, ग्रामस्थ यांचेही अभिनंदन होत आहे.
दीनदयाळ उपाध्याय पंचायत सशक्तीकरण पुरस्कारासाठी राज्यात सातारा जिल्हा परिषदेची झालेली निवड अभिमानास्पद आहे. खटाव आणि इंजबाव ग्रामपंचायतींनी आपल्या कार्याचा झेंडा राज्यात फडकवला आहे. जिल्हा परिषदेचे सर्व पदाधिकारी आणि उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनोज जाधव, अविनाश फडतरे, संबंधित तालुक्यांचे गटविकास अधिकारी, ग्रामपंचायतीचे पदाधिकारी यांच्या एकत्रित प्रयत्नाचे हे फलित आहे. जिल्ह्यातील अन्य ग्रामपंचायतींनी प्रेरणा घेऊन जिल्ह्याचे नाव उज्ज्वल करावे.
संजय भागवत ,मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, सातारा.