पुणे – पुणे महानगर परिवहन महामंडळाने बसेसमध्ये केवळ आसन क्षमता आणि स्टॅन्डींगच्या (उभे राहण्याची क्षमता) 50 टक्के क्षमतेने नागरिकांना प्रवासास मुभा दिली आहे. याबाबत प्रशासनाने आदेश दिले होते. मात्र, काही दिवसांत प्रवासी आणि पीएमपी कर्मचाऱ्यांना विसर पडला असून, पीक अवर्समध्ये गर्दी होत आहे.
शहरातील करोना बाधितांची संख्या वाढत आहे. कर्मचाऱ्यांसह प्रवाशांना मास्कचे बंधन केले आहे. या नियमाचे सुरुवातीचे काही तास पालन झाले. मात्र, प्रवासी आणि प्रशासन दोघांनाही नियमांचा विसर पडल्याचे दिसत आहे. अनेक प्रवासी मास्क वापरणे टाळत असून, कर्मचारीदेखील याकडे दुर्लक्ष करत आहेत. याशिवाय, बसथांब्यांवर प्रवाशांची गर्दी होत आहे. काहीवेळा मास्क वापरण्याबाबत कर्मचारी आणि प्रवाशांमध्ये खटके उडत आहेत.
जिल्ह्यातील बसेसना नियमांमधून सूट आहे का?
शहरातून पीएमआरडीए हद्दीतील काही गावांमध्ये डिसेंबरपासून बसेस सोडण्यात येत आहेत. यामध्ये दररोज शहरात ये-जा करणाऱ्यांची संख्या अधिक असल्याने बहुतांश बसेस “फुल्ल’ होतात. यामध्ये प्रवाशांकडून मास्क वापरण्यास टाळाटाळ करण्यात येते. अनेक प्रवाशांचे मास्क गळ्यात अडकवलेले असतात. इतकेच नव्हे तर, या बसेसचे वाहक आणि चालक विनामास्क ड्युटी करतात. त्यामुळे जिल्ह्यातील बसेसना नियमांमधून सूट दिली आहे का, असा सवाल उपस्थित होत आहे.
सह प्रवाशाला मास्क वापरण्यास सांगितल्यास वादाचे प्रसंग उद्भवतात. बसेसमध्ये अधिक प्रवासी असल्याने नियमांचे पालन होत नाही.
बसेसची वारंवारता वाढवावी
सुरक्षिततेसाठी 50 टक्के क्षमतेचा नियम उचित आहे. मात्र, बसेसची संख्या आणि वारंवारता कमी आहे. याशिवाय, बसेसचे वेळापत्रक भरवशाचे नाही. परिणामी इच्छितस्थळी पोहोचण्यासाठी उशीर होते. त्यामुळे प्रशासनाने बसेसची वारंवार वाढवणे गरजेचे असल्याचे प्रवाशांनी सांगितले.
“आम्ही आमच्या जबाबदारीवर जातो’
प्रवाशांना कर्मचाऱ्यांकडून मास्कबाबत सातत्याने सूचना देण्यात येतात. मात्र, अनेकदा प्रवासी “आम्ही आमच्या जबाबदारीवर जातो’, असे वाहक आणि चालकांना म्हणतात. यासह बीआरटी मार्गात बसचे दरवाजे न उघडल्यास कर्मचाऱ्यांवर प्रवासी अरेरावी करत असल्याचे पीएमपीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
मास्क असल्याशिवाय प्रवाशांना बसमध्ये प्रवेश न देण्याच्या सूचना दिल्या आहेत. अनेकदा प्रवासी कर्मचाऱ्यांशीच वाद घालतात. बसमध्ये प्रवास करण्याबाबत कर्मचारी अटकाव करत असल्याच्या तक्रारी प्रवाशांकडून करण्यात येत आहेत. “पीक अवर्स’मध्ये ठराविक मार्गांवर बसेसमध्ये गर्दी होत असल्याचे लक्षात आले आहे. या पार्श्वभूमीवर येत्या काळात बसेसची संख्या वाढवण्यात येणार आहे. सध्या संचलनात सरासरी 1500 बसेस असून, यामध्ये साधारण 50 ने वाढ करण्यात येणार आहे.
– दत्तात्रय झेंडे, वाहतूक व्यवस्थापक, पीएमपी