नवी दिल्ली (वंदना बर्वे) – पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकीचा निकाल अद्याप लागायचा असला तरी मुख्यमंत्रिपदाने भाजप आणि कॉग्रेस हायकमांडची झोप उडविली आहे. राजस्थान, मध्यपद्रेश आणि छत्तीसगडमध्ये आपली सत्ता आली तर मुख्यमंत्री कुणाला बनवायचे? या प्रश्नाचे उत्तर मिळविण्यासाठी दोन्ही पक्षांनी ‘डावपेच’ आखायला सुरवात केली आहे.
पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकीचा निकाल रविवार दि. 3 डिसेंबर रोजी लागणार आहे. चार राज्यांमध्ये मतदान प्रक्रिया पूर्ण झाली असून 30 नोव्हेंबर रोजी तेलंगणात व्होट टाकले जाणार आहे. दोन दिवसानंतर मतमोजणी होणे आहे. मात्र, राजस्थान, मध्यप्रदेश आणि छत्तीसगडमध्ये आपली सत्ता आली तर मुख्यमंत्री कुणाला बनवायचे? असा प्रश्न कॉग्रेस आणि भाजपला पडला आहे.
परंतु, भाजप आणि कॉग्रेस हायकमांडची झोप उडविली आहे ती राजस्थानने. राजस्थानमध्ये कोणताही पक्ष सत्तेत आला तरी त्याला डोळ्यात तेल घालून मुख्यमं.ित्रपदाचा निर्णय घ्यावा लागणार आहे. कॉग्रेसचे सरकार आले तर विद्यमान मुख्यमंत्री अशोक गहलोत आणि उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांच्यापैकी कुणाच्या हाती राज्याची धुरा द्यायची याचा निर्णय कॉग्रेसला करावा लागणार आहे.
भाजपचे सरकार आले तर माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांना डावलून दुसऱ्यांना मुख्यमंत्री बनविण्याचा निर्णय घ्यावा लागणार आहे. सध्या जी नावे चर्चेत आहेत त्यात गजेंद्रसिंग शेखावत, अर्जुनराम मेघवाल, ओम बिर्ला आणि रेल्व्े मंत्री अश्विनी वैष्णव यांचा समावेश आहे.
मात्र, अशोक गहलोत आणि वसुंधरा राजे यांना साईडलाइन करणे दोन्ही पक्षांना सोपे जाणार नाही, हे मात्र खरे. अशोक गहलोत यांना राजस्थानच्या राजकारणाचा जादूगर म्हटले जाते. तर, वसुंधरा राजे म्हणतील तेच भाजपात होईल असं त्यांच्या बाबतीत बोलले जाते. सर्वात महत्वाचे म्हणजे, दोन्ही नेते एकमेकांचे प्रतिस्पर्धी असले तरी एकमेकांचे खूप चांगले मित्र आहेत.
मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीवर एकाला बसता येत नसेल तर दुसऱ्याला बसविण्यासाठी दोन्ही नेते एकत्र होतात असे म्हणतात. माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांच्या सरकारच्या काळात झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी व्हावी यासाठी उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांनी आंदोलनावर आंदोलन केले होते.
परंतु, गहलोत यांनी चौकशीचे आदेश दिले नाही. याचे पालन राजे मुख्यमंत्रीपदावर असताना करतात. महाराणी विरोधी पक्षनेत्या होत्या तेव्हाही भाजपमुळे गहलोत सरकार संकटात सापडणार नाही, याची इत्थंभूत काळती त्यांनी घेतली होती. यावरून दोन्ही नेत्यांची मैत्री कशी आहे? याचा अंदाज बांधला जावू शकतो.
अशा परिस्थितीत कॉग्रेस आणि भाजपला मुख्यमंत्रीपदावर कुणाला बसवायचे? याचा निर्णय घ्यायचा आहे. यामुळे हाई व्होल्टेज ड्रामा होण्याची दाट शक्यता आहे. भाजपला मध्यप्रदेश आणि राजस्थान या दोन्ही राज्यांत चेहरा बदलायचा आहे. कॉग्रेसपुढे चेहऱ्याचे संकट फक्त राजस्थानपुरते आहे. मध्यप्रदेशात कमलनाथ यांना मुख्यमंत्रीपदाचा चेहरा म्हणून आधीच पुढे करण्यात आले आहे. छत्तीसगडमध्ये सरकार आले तर कॉग्रेसकडून जुनाच चेहरा पुढे केला जाणार आहे.