शांततेसाठी लष्करी सामर्थ्य हवे
कोईमतूर, ता. 29 – शेजाऱ्यांशी शांततेने राहण्यासाठी भारत लष्करीदृष्ट्या समर्थ असला पाहिजे, असे संरक्षणमंत्री बाबू जगजीवनराम म्हणाले. पाकिस्तानशी शांततेने राहावयाचे असो किंवा चीनशी संघर्ष टाळावयाचा असो आपले सामर्थ्य आहे हे त्यांना समजल्यावरच शांततेच्या वाटाघाटी होऊ शकतात, असेही ते म्हणाले.
बांगलादेशाला मान्यता द्यावी लागेल हे भुट्टोंनाही पटले
नवी दिल्ली – बांगलादेश निर्मिती ही आता वस्तुस्थिती झाली आहे. काही दिवसांनी आम्हाला त्याला मान्यता द्यावी लागेल, अशी कबुली पाकिस्तानचे पंतप्रधान जनाब भुट्टो यांनी आज दिली. तथापि योग्य वेळी मान्यता देण्याचा निर्णय माझ्यावर सोपवा, असेही पाकिस्तानचे पंतप्रधान जनाब भुट्टो म्हणाले.
स्वतंत्र तेलंगण हाच एक पर्याय
हैदराबाद – तेलंगणाचा प्रश्न सोडवण्यासाठी सुचविलेला सहा कलमी तोडगा आज कॉंग्रेस फोरम फॉर सेपरेट तेलंगणने फेटाळून लावला. या फोरमचे अध्यक्ष
डॉ. चन्ना रेड्डी आहेत. स्वतंत्र तेलंगणाशिवाय अन्य पर्याय नाही, असे यावेळी रेड्डी म्हणाले.
846 पाकिस्तान्यांची मायदेशी रवानगी
वाघा – आज आणखी 846 पाक युद्धकैदी व नागरिकांची भारताने पाकिस्तानला रवानगी केली. रवाना केलेल्या नागरिकांत 60 स्त्रिया व 192 मुले आहेत.
काटकसर त्याचबरोबर पगारवाढही!
कोलंबो – श्रीलंका सरकारने काटकसरीच्या अनेक योजना आखल्या आहेत. पण त्याचबरोबर 400 रु. पर्यंत वेतन असणाऱ्या कामगारांना 10 टक्के पगारवाढ देण्याचे ठरविले आहे. ही वाढ जास्तीत जास्त 20 रु. पर्यंत दिली जाईल.