तटस्थ राष्ट्र परिषदेतील अगतिकता या वेळी संपूर्णपणे नाहीशी झाली
नवी दिल्ली, ता. 10 – तटस्थ राष्ट्रांमध्ये आर्थिक व राजकीय क्षेत्रात सहकार्य निर्माण करण्याचे नवे युग निर्माण झाले. त्या दृष्टीने तटस्थ राष्ट्रांच्या परिषदेत अतिशय रचनात्मक व विधायक सूचना करण्यात आल्या. त्यांची कार्यवाही होणे मात्र आवश्यक आहे, असे मत पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी आज अल्जिअर्सहून येथे परतल्यावर व्यक्त केले.
तटस्थ राष्ट्रांची ही चौथी परिषद अतिशय महत्त्वाची झाली. या परिषदेला तटस्थ राष्ट्रांचे सर्व प्रमुख नेते हजर होते, ही विशेष घटना आहे. या सर्व नेत्यांनी “काही तरी करून दाखवू’ असा आत्मविश्वास व्यक्त केला आहे. पूर्वी तटस्थ राष्ट्र परिषदेत अगतिकता व्यक्त केली जात असे परंतु यावेळी ती स्थिती नाहीशी झाली आहे. इतर राष्ट्रांबरोबर वागण्याचा नवा समजूतदारपणा यावेळी दिसून आला.
टिळक रस्त्यावर “निवांत भाग’ हवा
पुणे – टिळक रस्त्यावर महाराष्ट्र मंडळ ते न्यू इंग्लिश स्कूल या दरम्यान “सायलेन्स झोन’ स्थापन करावा, अशी विनंती महाराष्ट्र साहित्य परिषदेतर्फे कार्याध्यक्ष कुलकर्णी यांनी पोलीस आयुक्तांना केली आहे. साहित्य परिषदेतील माधवराव पटवर्धन सभागृहामध्ये चालू असलेल्या कार्यक्रमांना रस्त्यावरील वाहनांच्या भोंग्यांनी विलक्षण त्रास होतो, म्हणून ही विनंती करण्यात आली आहे.
सरकारी दूध पुरवठ्यात वाढ
पुणे – उद्या दि. 11 पासून येथील सरकारी दूध पुरवठ्यात थोडी वाढ होत आहे. खालीलप्रमाणे वाटप होईल- चार व त्यावरील बाटल्याधारकांना तीन बाटल्या, तीन बाटल्याधारकांना दोन, दोन बाटल्याधारकांना एक मोठी व एक लहान, आणि एक बाटलीवाल्यांना एक मोठी बाटली, अशा प्रमाणात वाढीव दूध पुरवठा करण्यात येणार आहे.