जे जाणणेया आघवेयांच्या गांवीं । गुरुत्वाची आचार्य पदवी । जें सकळ गुह्यांचा गोसावी । पवित्रां रावो ।। 47 ।। आणि धर्माचें निजधाम । तेवींची उत्तमाचें उत्तम । पैं जया येतां नाहीं काम । जन्मांतराचें ।। 48 ।। मोटकें गुरुमुखें उदैजत दिसे । आणि हृदयीं स्वयंभचि असे । प्रत्यक्ष फावों लागे तैसें । आपैसयाचि ।। 49 ।। अध्याय 9 वा
संत ज्ञानेश्वर माऊली या ठिकाणी गुरूकडून प्राप्त होणाऱ्या श्रेष्ठ ज्ञानाविषयी आपले विचार प्रकट करतात आणि त्या ज्ञानामुळे साधकाला येणाऱ्या चिरंतन अनुभवासंबंधी भाष्य करतात. ज्या ज्ञानाला सुविद्यांच्या ज्ञानाच्या गावात थोरपणाची श्रेष्ठ “आचार्य’ अशी मान्यवर ही पदवी मिळते,
जे सगळ्या गुह्यांचा स्वामी आहे व सर्व पावन करणाऱ्यांमध्ये श्रेष्ठ आहे आणि जे धर्माचे राहण्याचे घर आहे, जे उत्तमात उत्तम आहे तसेच ज्या ज्ञानाला प्राप्त झाले असता पुन्हा दुसऱ्या जन्माला येण्याचे कारण राहत नाही.
हे ज्ञान गुरूच्या मुखातून प्रकट होताना थोडेसेच दिसते. पण ते ज्ञान साधकाच्या हृदयात मात्र उपजतच असते; तसे ते आपोआप प्रत्यक्ष अनुभवाला येऊ लागते. गुरू येथे फक्त निमित्त मात्र असतात.