भारत-पाक व्यापार सुरूः कराराची अंमलबजावणी
नवी दिल्ली, दि. 7 – भारत-पाक यांच्या दरम्यान 30 नोव्हेंबर रोजी झालेल्या करारानुसार आज उभय देशातील व्यापारबंदी उठविण्यात आली. गेली नऊ वर्षे उभय देशातील व्यापार बंद होता. उभय देशामध्ये ताश्कंद करार झाल्यानंतर लगेच भारताने पाकबरोबर व्यापार सुरू करण्याची तयारी दर्शविली होती.
परंतु त्यावेळच्या पाकच्या अध्यक्षांनी व्यापारास अनुमती दिली नाही. या घोषणेनंतर भारताने व्यापारावरील बंदी एकतर्फी उठविली. 65 साली दोन्ही देशात युद्ध झाल्यानंतर हा व्यापार एकदम थंडावला होता.
लोकसभेची हिवाळी बैठक गारठली?
नवी दिल्ली – लोकसभेचे हिवाळी अधिवेशन सुरू होऊन आता तीन आठवडे झाले तथापि अद्याप अधिकृत कामकाज सुरूच झालेले नाही. आयात परवाने प्रकरणीचा अहवाल गृहापुढे ठेवावा किंवा नाही याबाबत स्पीकर निर्णय देऊ शकत नाहीत तोवर गाडे पुढे जाणार नाही.
साखर व्यवसायाचे राष्ट्रीयीकरण करा
नवी दिल्ली – साखर व्यवसायातील कामगार, विक्रेते व ग्राहक यांना उत्पादक व मालकाकडून होणारा त्रास व अन्याय दूर करण्यासाठी साखर व्यवसायाचे राष्ट्रीयीकरण करावे, अशा स्वरूपाचे मागणीपत्र पंतप्रधान इंदिरा गांधी यांना सादर करण्यात आले आहे. या पत्रकावर 257 खासदारांच्या सह्या आहेत. साखर व्यवसायातील नफेबाजी रोखण्यास सध्याचे सर्व मार्ग अयशस्वी ठरले आहेत, असेही त्यांनी या पत्रात म्हटले आहे.
झोपडपट्टी निर्मूलन व अल्प उत्पन्नाच्या लोकांसाठी घरे मिळतील
पुणे – आज येथे महाराष्ट्रातील झोपडपट्टी निर्मूलनाच्या व अल्प उत्पन्नाच्या कुटुंबियांसाठी घरे बांधण्याच्या प्रश्नासंबंधी केंद्रीय बांधकाम व घरबांधणी खात्याचे राज्यमंत्री मोहन धारिया म्हणाले, हा प्रश्न अत्यंत बिकट झाला असून तो सोडवण्यासाठी राज्य सरकारकडून आवश्यक रकमेची तरतूद केली जाईल.