पाकने संघर्षाचे धोरण सोडावे
जालंदर, दि. 28 – रेडिओ आणि टेलिव्हिजनवरून भारताविरूद्ध प्रचार करण्याचे पाकिस्तानने सोडून द्यावे, असा सल्ला संरक्षणमंत्री स्वर्णसिंग यांनी काल पाकिस्तानला दिला. दोनशे मीटर उंचीच्या टेलिव्हिजन मनोऱ्याच्या कोनशीला समारंभानंतर झालेल्या सभेत बोलताना संरक्षणमंत्री म्हणाले, पाकिस्तानला जर मित्रराष्ट्र म्हणून वागता येत नसेल तर त्यांनी कमीत कमी चांगला शेजारी म्हणून राहावे. केवळ शस्त्राने देशाचे संरक्षण करता येणार नाही.
क्रिकेट नियमानुसार खेळावे
पुणे – क्रिकेटमधील नियम वारंवार बदलण्यापेक्षा खेळाडूंची वागणूक बदलली पाहिजे, असे परखड उद्गार माजी कसोटी क्रिकेट पंच ए. एम. मामसा यांनी क्रिकेट परिषदेत काढले.
महाराष्ट्रात 1 मे पासून 24 टक्के वीजकपात
मुंबई – वीजपुरवठ्याची परिस्थिती आणखी बिघडल्याने महाराष्ट्र सरकारने 1 मे पासून आणखी 24 टक्के वीजकपात करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रोसेसिंग युनिट्स आणि कापड उद्योगासाठी वीजकपात सध्याच्या 26 टक्क्यांवरून 50 टक्के करण्यात आली आहे.
राधानगरी धरणग्रस्तांनी लढ्याचे रणशिंग फुंकले
कोल्हापूर – राधानगरी धरणग्रस्त अशा 7 गावांतील स्त्रीपुरुषांची परिषद वलवण येथे होऊन त्यात धरणग्रस्तांच्या प्रश्नासाठी आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला. समाजवादी पक्षाने आयोजिलेल्या या परिषदेच्या अध्यक्षस्थानी बापूसाहेब पाटील होते. बाबा आढाव यांनी यावेळी मार्गदर्शन केले.