साहित्यिक वादांना राजकीय स्वरूप नको
पणजी, दि. 27 – लेखकांमधील वाद केवळ साहित्यिकांच्या चर्चा-मंडळाद्वारेच सोडविले जावेत; त्या प्रश्नांना राजकीय स्वरूप दिले जाऊ नये, असे उद्गार सुप्रसिद्ध नाटककार प्रा. वसंत कानेटकर यांनी वास्को येथे 14 व्या गोमंतक मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन करताना काढले. व्यंकटेश माडगूळकर हे या संमेलनाचे अध्यक्ष आहेत. साहित्यिकांवर अधिकारारूढ व्यक्तींकडून आणल्या जाणाऱ्या राजकीय दबावाबद्दल आपल्या भाषणात प्रा. कानेटकरांनी चिंता व्यक्त केली. लेखकांना समाजाने पुरेसे उत्तेजन दिले नाही तर तो समाज जागच्या जागीच राहील.
नव्या मुंबईत ऑलिम्पिक नगरी
मुंबई – भारतात ऑलिम्पिक स्पर्धा व्हाव्यात ही अनेक क्रीडाप्रेमी लोकांच्या मनात असलेली इच्छा पूर्ण होण्याची आशा निर्माण झाली आहे. भारतात ऑलिम्पिक नगरी हे आता केवळ स्वप्न राहाणार नाही. मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष व विधानसभेचे सभापती वानखेडे यांनी असे सुचविले आहे की, नव्या मुंबईत दोनशे हेक्टर जमीन क्रीडा केंद्रासाठी राखून ठेवावी. जर आतापासून तयारी सुरू केली, तर 10 वर्षांनी ऑलिम्पिक स्पर्धा भारतात होणे कठीण नाही. नव्या मुंबईच्या रचनेच्या कामावरील अधिकाऱ्यांनी आपली सूचना स्वीकारली असल्याचेही वानखेडे यांनी सांगितले.