चाच्यांना मुक्त करण्याचा पाकचा निर्णय खेदजनक
नवी दिल्ली, दि. 6 – इंडियन एअरलाइन्सचे विमान पळविणाऱ्या चाच्यांवर फौजदारी खटले न भरता त्यांना मुक्त करण्याचा निर्णय पाकिस्तान सरकारने घेतला असून भारताने आज त्याबद्दल खेद व्यक्त केला. खटले भरता येऊ शकतील असा पुरेसा पुरावा उपलब्ध झाला नाही हे पाकिस्तानने दिलेले कारण अतिशय खेदजनक आहे. या गुन्हेगारांना भारताच्या ताब्यात द्यावे, ही भारताची विनंतीही पाकिस्तानने फेटाळली आहे.
पाकिस्तानच्या या वागणुकीबद्दल भारत खेद व्यक्त करीत आहे. कारण दोन्ही देशातील संबंध सुरळीत करण्याच्या प्रक्रियेशी ही वागणूक सुसंगत नाही. परस्परांतील संबंध केवळ परस्पर विश्वास व परस्परांना समजून घेणे याच पायावर बळकट होऊ शकतील. पाकिस्तानचा हा निर्णय त्यांनी भारताला दिलेल्या आश्वासनांच्या विरुद्ध आहे.
जन्म-मृत्यू नोंदणीसाठी नवीन नियम
मुंबई – जन्म-मृत्यू नोंदणी कायद्याखाली सरकारने नव्याने नियम तयार केला असून त्यानुसार जन्म-मृत्यूची नोंद विशिष्ट कालावधीत करायची आहे. यामुळे राज्यात सर्वत्र एकाच पद्धतीने नोंद होईल. महापालिका व कॅन्टोमेंट विभागात नोंदणी अधिकाऱ्यास 7 दिवसांच्या मुदतीत जन्माची माहिती लेखी कळवायची आहे व मृत्यूची माहिती 3 दिवसांत कळवायची आहे. इतर विभागात हा कालावधी जन्म नोंदणीसाठी 14 दिवस व मृत्यूनोंदणीसाठी 7 दिवस असा आहे.
वर नमूद केलेल्या मुदतीबाहेर परंतु, महिन्यापूर्वी माहिती दिल्यास 1 रुपया लेट फी आकारली जाईल. वाहनांमध्ये जन्म-मृत्यू झाल्यास वाहानांच्या मुख्याने संबंधित माहिती आपल्या उताराच्या पहिल्या ठिकाणी नोंदणी अधिकाऱ्याकडे द्यायची आहे. हे नवे नियम जन्म-मृत्यू नोंदणी कायद्यानुसार लागू होतील.