जगात भारताची प्रतिष्ठा उंचावली
नवी दिल्ली – केंद्रीय परराष्ट्र खात्याचे मंत्री अटल बिहारी वाजपेयी हे आज सकाळी न्यूयॉर्कहून येथे परत आले. वार्ताहरांशी बोलताना ते म्हणाले, की या घटकेस भारताची प्रतिष्ठा जगात उंचावलेली आहे. वाजपेयी पुढे म्हणाले, मी यूनोच्या बैठकीत गेलो त्यावेळी 50 वर परराष्ट्र मंत्र्यांशी बातचीत केली. मी चिनी परराष्ट्र मंत्र्यालाही भेटलो. भारताची अलिप्ततेची भूमिका जगात अधिक ठळकपणे अनुभवास आली. विशेषतः मोरारजींची रशियाला भेट व अमेरिकन अध्यक्षांची भारत भेट यामुळे ही अलिप्तता अधिकच प्रकर्षाने प्रतित झाली.
कुलगुरूंची निवड मतदानाने करण्याची मागणी
पुणे – पुणे विद्यापीठाच्या कुलगुरूंची निवड ही मतदान पद्धतीने व्हावी, हा प्रा. मुकुंद अभ्यंकर यांचा ठराव आज विद्यापीठ कार्यकारिणीने संमत केला. विधी समितीच्या स्वायत्ततेवर बंधन येत असल्याने त्याबाबत उपयायोजना करावी, अशी मागणी ठरावात करण्यात आली आहे.
भारतातील कोळसा व इतर खाणी बंद पडण्याचा धोका
नवी दिल्ली – इंग्लंड किंवा ऑस्ट्रेलिया येथून विमानाने स्फोटक पदार्थ आणण्याची व्यवस्था केली जात आहे. यामुळे भारतातील खाण उद्योगच समूळ बंद पडण्याचा धोका आहे.