पुणे – केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतील चार आमदार संपर्कात असल्याचा दावा केला आहे. राणेंच्या या दाव्यानंतर पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत मोठी फूट पडणार का? अशी राजकीय चर्चा सुरु झाली आहे. राणे म्हणाले, शिवसेना संपली आहे. 56 आमदारावरुन सहा-सातवर आलेत. त्यातील काही आमच्याकडे येण्याच्या मार्गावर आहेत. ते कधीही सहभागी होतील. माझ्या संपर्कात चार आमदार आहेत, असे नारायण राणे म्हणाले, ते पिंपरी चिंचवडमध्ये बोलत होते.
यावेळी नारायण राणेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर कौतुकाचा वर्षाव केला. ते म्हणाले, तरुण-तरुणींना नोकरी उपलब्ध व्हावी यासाठी नरेंद्र मोदी प्रयत्न करत आहेत. देशातील 10 लाख तरूणांना नोकरी देण्यात येणार आहे. शासनाच्या विविध विभागात नोकऱ्या दिल्या आहेत. पंतप्रधान मोदींनी चांगले काम केले आहे. त्यांनी आज 75 हजार नोकऱ्या दिल्या, ज्यांना नोकऱ्या मिळाल्या त्यांना आनंद आहे.
आनंदाचा शिधा वाटपाबाबत बोलताना राणे म्हणाले, शिधा वाटपाला कोणताही उशीर झाला नाही, फोटो लावला तर काय बिघडले. एवढा त्रास होत असेल तर कागद लावून पाकीट फोडा. फोटोमुळे आक्षेप घेणे ही संकुचित वृत्ती झाली. काही उशीर झाला नाही, हे राजकारण सुरु आहे…आता काही हातात राहिले नाही. घरबसल्या षडयंत्र करत रहायचे एकच काम आहे, असा टोला नारायण राणेंनी उद्धव ठाकरेंना लगावला.
दरम्यान, नारायण राणे यांच्या वक्तव्याचा आदित्य ठाकरेंनी समाचार घेतला. आदित्य ठाकरे म्हणाले, राणेंची ही सवयच आहे. चार पक्षात गेले त्यांनी काय केलं.. हे सांगायची गरज नाही. त्यांनी त्यांच्या पदाचा फूल फॉर्म सांगावा, असे म्हणत त्यांनी नारायण राणेंना टोला लगावला.