मुंबई- सरलेल्या 2078 या संवत्सरामध्ये जागतिक पातळीवर बऱ्याच नकारात्मक घडामोडी घडल्या तरी भारतीय अर्थव्यवस्थेने आगेकूच चालू ठेवली आहे. इतर देशाचे विकासदर नकारात्मक पातळीवर असताना भारताचा विकासदर वाढणार आहे. रशिया -युक्रेन युद्ध या वर्षात रेंगाळले. त्याचबरोबर जागतिक पातळीवर महागाईने धुमाकूळ घातला आहे. अशा परिस्थितीतही भारतीय शेअर बाजार निर्देशांकांची कमी हाणी झाली.
सरलेल्या संवत्सर वर्षांत मुंबई शहर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स केवळ 464 अंकांनी तर निफ्टी केवळ 252 अंकांनी कमी झाला आहे. आता मंगळवारी 24 ऑक्टोबर रोजी 2079 ते नवे संवत्सर वर्ष सुरू होणार आहे. मात्र सध्या जागतिक पातळीवर नकारात्मक वातावरण असूनही भारतीय शेअर बाजाराचे निर्देशांक गेल्या सहा दिवसापासून एकतर्फी वाढत आहेत.
संवत्सरच्या पहिल्या दिवशी मुहूर्त व्यवहार केले जातात. या दिवशी व्यवहार केल्यानंतर समृद्धी वाढते असे भारतात समजले जाते. यावर्षी मुहूर्त व्यवहारावेळी बरीच खरेदी होण्याची शक्यता आहे. मात्र देशात आणि परदेशात बऱ्याच नकारात्मक घडामोडी घडत असल्यामुळे गुंतवणूकदार यावर्षी सावध राहून व्यवहार करण्याची शक्यता आहे. मुहूर्तावेळी शेअर बरोबरच डेरीवेटीव्ह, कमोडिटी डेरिव्हेटिव्ह, फ्युचर अँड ऑप्शन्स इत्यादीचे व्यवहार केले जातात.
गेल्या 15 वर्षात 11 वेळी मुहूर्त व्यवहारावेळी शेअर बाजार निर्देशांकात वाढ झाली. त्यामुळे आगामी मुहूर्त व्यवहाराबाबतही ब्रोकर्स आशावादी असल्याचे दिसून येते. सरलेल्या वर्षांमध्ये इतर शेअर बाजाराचे जास्त नुकसान झाले आहे. मात्र भारतीय शेअर बाजाराचे कमी नुकसान झाले. ज्यांनी खबरदारी घेऊन व्यवहार केले आहेत त्यांना या वर्षांमध्ये चांगला परतावा मिळाला आहे.
आता भारतीय अर्थव्यवस्था उत्तम आहे. त्यामुळे काही गुंतवणूकदार आशावादी आहे. मात्र युक्रेन, अमेरिकेतील व्याजदर वाढ, कच्च्या तेलाचे वाढत असलेले दर, महागाई, चीनमध्ये रेंगाळलेली अर्थव्यवस्था या नकारात्मक बाबी घोंगावत आहेत. विश्लेषकांनी सांगितले की, संवत्सर 2079 मध्ये बॅंका, भांडवली वस्तू, मॅन्युफॅक्चरिंग कंपन्या चांगले काम करण्याची शक्यता आहे. तंत्रज्ञान आणि औषधी क्षेत्रही चांगला परतावा देऊ शकते. 26 ऑक्टोबर रोजी म्हणजे बुधवारी बलिप्रतिपदेनिमित्त शेअर बाजाराचे व्यवहार बंद राहणार आहेत.