जयपूर – राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्या भवितव्याविषयीचा सस्पेन्स कायम आहे. अशात त्यांनी कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेवर स्तुतिसुमने उधळण्याचा सपाटा लावला आहे. प्रशंसेचा तो फंडा गेहलोत यांच्या कामी येणार का ते आगामी काळात स्पष्ट होईल.
गांधी परिवाराच्या मर्जीतील नेते म्हणून गेहलोत यांच्याकडे नेहमीच पाहिले गेले. त्यातून कॉंग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी गेहलोत पहिली पसंती ठरले होते. त्यांनी अध्यक्ष बनण्याआधी राजस्थानमध्ये नवा मुख्यमंत्री निवडण्याची कॉंग्रेसची योजना होती. मात्र, गेहलोत यांनी मुख्यमंत्रिपदी कायम रहावे यासाठी त्यांच्या समर्थक आमदारांनी एकप्रकारे बंडाचे निशाण फडकावले. त्यातून गेहलोत यांनी गांधी परिवाराची नाराजी ओढावून घेतली.
समर्थकांच्या बंडामुळे गेहलोत स्वत:च पक्षाध्यक्षपदाच्या शर्यतीतून बाहेर पडले. पण, राजस्थानमधील घडामोडी कॉंग्रेसच्या दृष्टीने नाचक्की ठरली. त्यामुळे राजस्थानच्या नेतृत्वाविषयी निर्णय घेण्याचे सूतोवाच पक्षाकडून करण्यात आले. त्यातून समर्थकांच्या बंडाची किंमत गेहलोत यांना मोजावी लागेल, असे चित्र पुढे आले. मात्र, अध्यक्षपद निवडणुकीच्या प्रक्रियेमुळे राजस्थानचा विषय काहीसा मागे पडला.
आता ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खर्गे यांच्या रूपाने कॉंग्रेसला नवे अध्यक्ष मिळाले आहेत. ते 26 ऑक्टोबरला अध्यक्षपदाची औपचारिक सुत्रे स्वीकारणार आहेत. त्यानंतर कॉंग्रेसच्या अजेंड्यावर पुन्हा राजस्थानचा विषय येण्याची शक्यता आहे. त्याची बहुधा जाणीव असल्यानेच गेहलोत यांनी गांधी परिवाराला खुष करण्याचे प्रयत्न चालवले आहेत. त्यातून ते सातत्याने राहुल आणि त्यांच्या यात्रेची प्रशंसा करत आहेत.
गेहलोत यांनी शनिवारीही ते सत्र कायम ठेवले. देशातील वाढती महागाई, बेरोजगारी, द्वेष, हिंसेचा निषेध करण्यासाठी राहुल यांनी यात्रा सुरू केली. त्या यात्रेचे यश पाहून भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नेत्यांची वक्तव्येही बदलू लागल्याचे दिसते. कॉंग्रेसच्या यात्रेमुळे देशातील वातावरणही बदलेल, अशी भूमिका त्यांनी ट्विटरवरून मांडली.