पाटण – पाटणच्या भूस्खलन झालेल्या बाधित गावांच्या प्रश्नाबाबत मंत्रालयातील मुख्यमंत्री समिती कक्षात आज बैठक झाली. पाटण तालुक्यातील आंबेघर खालचे, आंबेघर वरचे, ढोकावळे, मिरगाव, हुंबरळी, शिद्रुकवाडी, जितकरवाडी (जिंती) या सात गावांच्या कायमस्वरूपी पुनर्वसनाचा प्रश्न सोडविण्यासाठी चार कोटी रूपयांच्या निधीची तरतूद करण्याची सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली.
अतिवृष्टीमुळे भूस्खलन झालेल्या पाटण तालुक्यातील बाधित गावांच्या पुनर्वसनाबाबत मंत्रालयातील मुख्यमंत्री समिती कक्षात आयोजिलेल्या बैठकीत मुख्यमंत्री शिंदे यांनी पाटणवासियांना सर्वतोपरी सहकार्य करु, असे आश्वासित केले. मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, “पाटण तालुक्यातील अतिवृष्टीमुळे भूस्खलन झालेल्या आंबेघर खालचे, अंबेघर वरचे, ढोकावळे, मिरगाव, हुबळी, शिद्रुकवाडी, जितकरवाडी (निती) या सात गावांचे कायमस्वरुपी पुनर्वसन करण्याच्या अनुषंगाने खासगी जमीन खरेदी करण्याकरीता तातडीने कार्यवाही करण्यात यावी. या गावामध्ये 550 घरे नव्याने उभारण्याच्या कामाला गती देण्यात यावी.
या गावांचा कायमस्वरूपी पुनर्वसनाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी सर्व समन्वयक यंत्रणांनी गतीने काम करावे, अशी सूचना देखील मुख्यमंत्री शिंदे यांनी बैठकीत उपस्थित अधिकाऱ्यांना केली. या बैठकीस आमदार शंभूराज देसाई, अप्पर मुख्य सचिव (महसूल) नितीन करीर, मदत व पुनर्वसन विभागाचे प्रधान सचिव असिम कुमार गुप्ता, वित्त विभागाच्या सचिव श्रीमती ए. शैला, साताऱ्याचे जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, पाटणचे प्रांताधिकारी सुनील गाढे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.