सततच्या हवामान बदलाचा परिणाम; शहरातील बहुतांश रुग्णालये फुल्ल
पिंपरी – गेल्या काही दिवसांमध्ये शहरातील हवामानात मोठ्या प्रमाणावर बदल झाला आहे. सकाळी धुके, दुपारी ढग आणि उकाडा तर रात्री कडाक्याची थंडी पडत असल्याने हवामान दमट बनले आहे. बदलत्या हवामानाचा विपरीत परिणाम शहरवासीयांच्या आरोग्यावर होत असून, 1 जानेवारी ते 9 जानेवारी 2020 या अवघ्या 9 दिवसांच्या कालावधीत तब्बल 39,333 रुग्ण साथीच्या आजाराने त्रस्त झाल्याचे समोर आले आहे. तर दिवसेंदिवस रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याने शहरातील बहुतांश रुग्णालये हाऊसफुल्ल झाल्याचे पहावयास मिळत आहेत.
लांबलेला पाऊस, शहरात आलेला पूर यामुळे ऑगस्ट-सप्टेंबरपासूनच शहरात साथीच्या आजाराचे रुग्ण वाढले होते. यावर्षी नोव्हेंबर अखेरपर्यंत पावसाने शहरात हजेरी लावली होती. वातावरण बदलल्याने लहाण मुले व ज्येष्ठ नागरिकांना याचा सर्वांत मोठा फटका बसत आहे. महिन्याला दहा हजारांहून अधिक रुग्णांवर उपचार सुरू होते. डिसेंबर महिन्यात पावसाने उघडीप दिल्याने शहरामध्ये थंडीची सुरुवात झाली. डिसेंबर महिना अखेरीस तापमानात घट होऊन थंडीची तीव्रता वाढली होती.
मात्र, 27 डिसेंबरनंतर काही ठिकाणी पुन्हा पावसाच्या सरी कोसळल्या व वातावरण ढगाळ होण्यास सुरुवात झाली. हीच स्थिती जानेवारीच्या पहिल्या आठवड्यातही शहरात सुरू होती. त्यामुळे रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढण्यास सुरुवात झाली. पहाटे धुके आणि कडक थंडी, दुपारी ढगाळ वातावरण तर कधी कडक ऊन आणि रात्री पुन्हा कडक थंडी असे वातावरण निर्माण झाल्याने हवामानातील दमटपणा अधिकच वाढला. त्यामुळे साथीच्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढू लागली आहे.
अचानक बदललेल्या वातावरणामुळे ताप, थंडी, खोकला, सर्दी यासारख्या आजाराने नागरिक त्रस्त झाले आहेत. यामुळे, शहरातील महापालिका रुग्णालयांसह खासगी रुग्णालयांत रुग्णांची संख्या वाढलेली आहे. ढगाळ वातावरणामुळे दम्याच्या रुग्णांमध्येही वाढ झाली आहे. लहान मुलांमध्ये संसर्गजन्य आजार बळावले आहेत.
आरोग्याची काळजी घ्या
याबाबत महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. राजेंद्र वाबळे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, गेल्या महिन्यापासून हवामानामध्ये बदल जाणवत आहे. थंडीचे प्रमाण वाढल्याने ज्यांची रोगप्रतिकारकशक्ती कमी आहे, अशा व्यक्तींमध्ये आजाराचे प्रमाण वाढले आहे. थंडीमध्ये धुके येत असल्याने त्याचा परिणाम आरोग्यावर होत आहे. वातावरणातील बदलामुळे वायसीएम रुग्णालयात ओपीडी रुग्णांच्या संख्येतही मागील चार ते पाच दिवसांपासून मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. या दिवसांमध्ये जास्त प्रमाणात पाणी पिणे, ताजे अन्नपदार्थ खाणे, अशी काळजी घेतली पाहिजे. लहान मुलांना उबदार कपडे घालावेत. सकाळी व सायंकाळी मुलांना बाहेर घेऊन फिरू नये. आजाराची काही लक्षणे आढळल्यास त्वरित वैद्यकीय अधिकाऱ्यांचा सल्ला घ्यावा.