“सरल पोर्टल’वरून आकडेवारी एकत्रित होणार
माहिती जमा करण्याचे काम विद्या प्राधिकरण करणार :शाळांची तपासणी होण्याची आवश्यकता
शिक्षकांना बालरक्षक ऍप उपलब्ध होणार
शाळाबाह्य मुलांचा शोध घेऊन त्यांना शाळेच्या प्रवाहात दाखल करण्याच्या कामात अधिक पारदर्शकता यावी यासाठी “यूनिसेफ’ च्या वतीने बालरक्षक ऍप विकसित करण्यात येणार आहे. हे ऍप राज्यातील सर्व बालरक्षकांना वापरासाठी उपलब्ध करून देण्यासंदर्भात शासनपातळीवरून निर्णय होण्याची प्रतीक्षा लागली आहे.
पुणे – राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये 35 हजार शाळाबाह्य मुले आढळून आली आहेत. त्यांना शाळेच्या प्रवाहात आणण्यात आले आहे. यातील प्रवेश घेतलेली किती मुले शाळांमध्ये टिकली आहेत याची “सरल’ पोर्टलद्वारे माहिती जमा करण्याचे काम महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या (विद्या प्राधिकरण) वतीने करण्यात येणार आहे.
अधिकाऱ्यांच्या विशेष पथकामार्फत शाळांमध्ये जाऊन तपासणी करण्याचीही आवश्यकता निर्माण झाली आहे. शाळाबाह्य मुलांकडे कोणतीही कागदपत्रे नसली तरी त्यांच्या पालकांकडून प्रतिज्ञापत्र घेऊन मुलांना शाळांमध्ये प्रवेश देण्याबाबत बंधनही घालण्यात आले होते. स्थलांतरित मुलांना एका शाळेतून दुसऱ्या प्रवेश घेता यावा यासाठी शिक्षण हमी पत्र उपलब्ध करून दिली जात आहे.
30 दिवसांपेक्षा जास्त दिवस अनुपस्थितीत राहणाऱ्या विद्यार्थ्यांना शाळाबाह्य समजण्यात येते. या विद्यार्थ्यांची आता सरल पोर्टलवरून आकडेवारी एकत्र जमा करण्याचे काम विद्या प्राधिकरणाच्या वतीने करण्यात येणार आहे, अशी माहिती विद्या प्राधिकरणातील समता विभागप्रमुख डॉ. प्रभाकर क्षीरसागर यांनी दिली आहे. प्रामुख्याने आदिवासी, समाजकल्याण विभागाच्या आश्रमशाळांमध्ये शाळांबाह्य मुलांना अधिक प्रमाणात प्रवेश देण्यात येतात. मात्र, या ठिकाणचे विद्यार्थी पुढे शाळांमध्ये कायम राहत नाहीत. या शाळांचे अनुदान बंद करण्याच्या घोषणा जिल्हाधिकाऱ्यांनी अनेकदा केल्या आहेत. मात्र, प्रत्यक्षात कारवाई झालेली दिसत नाही.