शालेय शिक्षण विभागाकडून सीईओ, आयुक्तांना आदेश
बालरक्षकांचा सत्कार होणार
महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या वतीने शाळाबाह्य मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात बालरक्षकांची निवड करण्यात आलेली आहे. गावस्तरावर उत्कृष्ट काम करणाऱ्या बालरक्षकांचा सत्कारही करण्यात येणार आहे.
पुणे – राज्यातील शाळांमध्ये 15 ऑगस्ट रोजी मुलांचे हक्क आणि सुरक्षितता यावर उपक्रम राबवावे लागणार आहेत. याविषयीचे आदेशच शालेय शिक्षण विभागाकडून जिल्हा परिषदांच्या मुख्य कार्यकारी अधिकारी, महापालिका आयुक्त यांना बजाविण्यात आले आहेत.
शिक्षण हक्क कायदा आणि संयुक्त राष्ट्रसंघाच्या बाल हक्क संहितानुसार प्रत्येक मुलांना शिक्षण मिळाले पाहिजे. यासाठी शिक्षणातील गळती कमी करणे व दर्जेदार शिक्षण देण्याची जबाबदारी आहे. मुलांच्या हक्कांची जाणीव समाजातील विविध घटकांना व्हावी व सर्व घटकांनी मुलांचे हक्क व सुरक्षा अबाधित राखण्याबाबत कटिबद्ध राहावे यासाठी विविध उपक्रम राबविण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
सर्व शाळांना मुलांची प्रभात फेरी काढावी लागणार आहे. या फेरीमध्ये मुलांचे हक्क व संरक्षण याबाबतच्या घोषणा व पोस्टरचा समावेश असणे आवश्यक आहे. ध्वजारोहण कार्यक्रमावेळी सर्व मान्यवरांनी शपथ घेण्याची गरज आहे. जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, शिक्षणधिकारी, गटशिक्षणाधिकारी, गावस्तरावरील शिक्षक, शासकीय कर्मचारी, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य यांना शपथ घेण्याचे बंधन घालण्यात आले आहे. ग्रामपंचायतीच्या ग्रामसभांमध्ये ठरावही मंजूर करून घ्यावे लागणार आहेत.