वांबोरी चारीच्या दुसऱ्या टप्प्यासाठी शंभर कोटी
राहुरी – आमदार शिवाजीराव कर्डिले यांनी सातत्याने केलेल्या पाठपुराव्यामुळे राहुरीच्या सुधारीत तीस कोटी रुपयांच्या पाणीयोजनेस मंजुरी देण्यात आली असून मंजुरीचे पत्र आज मी आ. कर्डिलेंना सुपूर्द करीत असल्याचे स्पष्ट करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वांबोरी चारीच्या दुसरे टप्प्यासाठी शंभर कोटी रुपये मंजूर केल्याचे शुक्रवारी जाहीर केले.
महाजनादेश यात्रा आज राहुरीत आली. तिचे जोरदार स्वागत झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी पालकमंत्री प्रा.राम शिंदे, गृहनिर्माणमंत्री राधाकृष्ण विखे, आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्यासह भाजपचे आमदार व पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी पाणीयोजनेचे पत्र मुख्यमंत्र्यांनी आ. कर्डिलेंना दिले. याबद्दल आ. कर्डिले यांचा परिवर्तनआघाडीचे चाचा तनपुरे, विरोधी पक्षनेते दादा पाटील सोनवणे यांनी सत्कार केला.
मुख्यमंत्री म्हणाले, पाच वर्षापूर्वी राज्यात सत्तांतर झाले. पंधरा वर्षे काम केले नाही म्हणून जनतेने यांना घरी बसवले. मात्र, हे जनतेत जात नाहीत. तर केवळ मतदान यंत्रांना दोष देत आहेत. दोष यंत्रात नाही तर त्यांच्या खोपडीत आहे. सन 2004 पासूनच्या सर्व निवडणुका यंत्रावरच झाल्या. ते जिंकले की यंत्र चांगले आणि आम्ही जिंकलो की यंत्र खराब असे कसे चालेल. राज्य सरकारने पाच वर्षात आधीच्या पंधरा वर्षातील आघाडी सरकारच्या काळापेक्षा कितीतरी पटीने विकास कामे केली. योजना राबवल्या.
पाच वर्षात आम्ही पन्नास हजार कोटी रुपयांचे अनुदान दिले. आघाडी सरकारने पंधरा वर्षात केवल वीस हजार कोटी रुपये दिले. आम्ही वीस हजार किलोमीटरचे राज्य व दहा हजार किलोमीटरचे राष्ट्रीय महामार्ग असे तीस हजार किलोमीटरचे रस्ते बनविले. महिला बचत गटाना बिनव्याजी एक लाख रुपयांचे कर्ज दिले जाईल. प्राथमिक शिक्षणात आम्ही तेरा क्रमांकावरुन चार क्रमांकावर आलो.पुढे पहिल्या क्रमांकावर येवू. शिक्षण, आरोग्य, रोजगार, उद्योग या सर्वच क्षेत्रात राज्य आघाडीवर आहे. आम्ही दुष्काळमुक्त राज्याचे स्वप्न साकार करु. कोकणातील पाणी गोदावरी खो-यात वळवू.
समृध्द व बलशाली भारताचे स्वप्न पंतप्रधान मोदीच्या नेत्ृत्वाखाली पूर्ण होणार आहे. असा जनतेचा विश्वास असून त्यासाठी राज्यातही आपलेच सरकारला जनादेश मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. आमदार शिवाजी कर्डीले यांनी प्रास्ताविकात देवेंद्र फडणवीस सारखे कार्यक्षम मुख्यमंत्री मी पाहिला नाही. पुढील मुख्यमंत्री ही तेच होतील, असा व्श्विास त्यांनी व्यक्त केला. तालुक्यात पंचवीस वर्षात आणला नाही एवढा 1200 कोटी रुपयांचा निधी या पाच वर्षात आणल्याचे त्यांनी सांगितले. खा. डॉ. सुजय विखे यांनी राज्यात अडीचशे आमदार निवडून येतील व जिल्ह्यात सर्वच्या सर्व जागी महायुतीचेच उमेदवार विजयी होतील. जावई लोकसभा निवडणूकीत उमेदवार असताना ही आमदार शिवाजी कर्डिलेंनी सहकार्य केले.