मुंबई – जागतिक बाजारातून नकारात्मक संदेश आल्यानंतर सोमवारी शेअर बाजाराचे निर्देशांक अडीज टक्क्यांनी कोसळले. त्यामुळे एकाच दिवसात गुंतवणूकदारांचे 3.7 लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले.
निर्देशांक विक्रमी पातळीवर गेल्यानंतर गेल्या आठवड्यात निर्देशांकाचा बराच घसारा झाला होता. मात्र जागतिक पातळीवर करोनाचे रुग्ण वाढू लागल्यानंतर त्याचा अर्थव्यवस्थेवर परिणाम होईल म्हणून गुंतवणूकदारानी नफा काढून देण्याचे धोरण स्वीकारले.
सोमवारी शेअर बाजारावर नोंदलेल्या कंपन्यांचे बाजार मूल्य 3.7 लाख कोटी रुपयांनी कमी होऊन 200 लाख कोटी रुपयांवर आले. गेल्या पाच दिवसापासून शेअर बाजाराचे निर्देशांक एकतर्फी कमी होत आहेत.
याबाबत बोलताना विश्लेषकांनी सांगितले की सध्या निर्देशांक विक्रमी पातळीवर आहेत. ते आगामी काळात आणखी कमी होऊ शकतात. आता राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीला 14,500 अंकावर आधार आहे.
आज मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेंसेक्सस 1,145 अंकांनी कमी होऊन 49,744 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 306 अंकांनी कोसळून 14,675 अंकांवर बंद झाला.