गुवाहाटी- आसाममधील आगामी विधानसभा निवडणुकीत सत्तारूढ भाजपशी ताकदीने दोन हात करण्यासाठी कॉंग्रेसने विशेष रणनीती आखली आहे. त्यातून त्या राज्यात चमत्कार घडवण्याच्या उद्देशातून कॉंग्रेसने छत्तिसगढ मॉडेलचा अवलंब केला आहे.
विधानसभेच्या एकूण 126 जागा असणाऱ्या आसाममध्ये मार्च-एप्रिलमध्ये निवडणूक अपेक्षित आहे. त्या निवडणुकीसाठी आसाममध्ये कॉंग्रेसने छत्तिसगढमधील टीम तैनात केली आहे. तिचे नेतृत्व अर्थातच छत्तिसगढचे मुख्यमंत्री भुपेश बघेल करत आहेत. बघेल आणि त्यांची टीम आसाममध्ये बूथ व्यवस्थापनाचे छत्तिसगढ मॉडेल राबवत आहे. छत्तिसगढमधील विधानसभा निवडणुकीत (2018) कॉंग्रेसने मतदानोत्तर चाचण्या आणि राजकीय पंडितांचे अंदाज चुकवत घवघवीत यश मिळवले. त्यामुळे भाजपला 15 वर्षांनंतर त्या राज्याची सत्ता गमवावी लागली. आता छत्तिसगढसारख्याच रणनीतीचा वापर कॉंग्रेसकडून आसाममध्ये केला जात आहे. आगामी निवडणुकीसाठी कॉंग्रेसने बघेल यांना आपले आसाममधील निरीक्षक बनवले आहे. त्यानंतर बघेल सातत्याने आसामचा दौरा करत आहेत.
छत्तिसगढ टीममध्ये 15 विशेष प्रशिक्षकांचा समावेश आहे. त्यांनी चालू महिन्यात आतापर्यंत आसाममधील 100 विधानसभा मतदारसंघांमध्ये कार्यकर्त्यांची प्रशिक्षण शिबिरे घेतली. त्या टीममुळे कार्यकर्त्यांचा उत्साह दुणावला आहे. त्यातून भाजपला जोरदार टक्कर देण्याबाबत कार्यकर्त्यांमधील विश्वास बळावला आहे, असे कॉंग्रेसच्या सुत्रांकडून सांगण्यात आले.