नवी दिल्ली : देशात आतापर्यंत कोरोना व्हायरसचे 28 बाधीत सापडले आहेत. त्यामुळे सर्व आंतरराष्ट्रीय विमाने आणि प्रवाशांचे स्क्रिनिंग करण्यात येणार असल्याची घोषणा केंद्रीय आरोग्य मंत्री हर्ष वर्धन यांनी केली.
यापुर्वी केवळ 12 देशांतील विमानांचे स्क्रिनिंग करण्यात येत असे. कोरोनाबाबत माहिती देताना ते म्हणाले, इराण सरकारला मदत हवी असेल तर तेथे कोरोनाची चाचणी घेण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यास भारत सरकार तयार आहे. त्यामुळे तेथील भारतीयांना मायदेशी आणणे सोयीचे होईल, असे ते म्हणाले.
दिल्लीच्या आरोग्य मंत्र्यांची आणि राज्य शासनाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली असून शहरातील सरकारी रुग्णालयात विलगता कक्ष उभारण्याच्या सुचना केल्या आहेत. भारतात सापडलेल्या 28 कोरोनाग्रस्तांची माहिती देताना ते म्हणाले, दिल्लीतील एक नागरिक, त्याचे आग्रा येथील सहा नातेवाईक, 16 इटालीयन पर्यटक आणि एक त्यांचा भारतीय ड्रायव्हर, हैदराबादमधील एक इंजिनिअर आणि यापुर्वी केरळात सापडलेले तीन जण अशा 26 जणांना बाधा झाली आहे.
विमानतळावर आतापर्यंत पाच लाख 89 हजार जणांचे स्क्रिनिंग करण्यात आले आहे. नेपाळच्या सीमेवर 10 लाख जणांचे स्क्रिनिंग केले आहे. तर 27 हजार जण सामुदायिक सर्वेक्षणाखाली आहेत.