पुणे – खडकवासला धरण ते फुरसुंगी 27 किलोमीटर लांबीच्या बोगद्यामधून पाणी नेण्याची योजना आखण्यात आली आहे. हा बोगदा बंद केल्यानंतर त्यावर खडकवासला ते फुरसुंगी असा थेट 27 किलोमीटरचा रस्ता विकसित केला जाणार आहे. त्यासाठी महापालिकेने सर्वेक्षण करून अहवाल सादर करण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महापालिकेस दिल्या आहेत.
याबाबत मनपा आयुक्त विक्रम कुमार यांनी माहिती दिली. त्यासाठी पुढील महिनाभरात या बोगद्याचे सर्वेक्षण करून त्याचा अहवाल सादर करण्यात येणार असल्याचेही कुमार यांनी सांगितले. खडकवासला धरणातून नवीन मुठा उजव्या कालव्यातून पाणी सोडले जाते. त्यात बाष्पीभवन, गळती, चोरी आर्दीमुळे सुमारे अडीच टीएमसी पाणी वाया जाते. शिवाय कालव्यात पडणारा कचरा यामुळे पाणी प्रदूषित होते. या पार्श्वभूमीवर हा बंद कालवा होऊ घातला आहे. यात सध्याचा कालवा बंद करून त्याऐवजी भूमिगत बोगद्यातून पाणी पुरवठा करावा, त्यासाठी सुमारे 2 हजार कोटींचा खर्च अपेक्षित आहे.
खडकवासला ते फुरसुंगी दरम्यान कालव्यालगत असलेली सुमारे दोन हजार हेक्टर जागा आहे. त्याचा व्यावसायिक पद्धतीने वापर केल्यास त्यातून मोठा निधी उभा राहू शकतो. अथवा रस्ता होऊ शकतो असे पर्याय आहेत. या बोगद्याचा प्रस्ताव जलसंपदा विभागाने तयार करून शासनास पाठविला आहे. मात्र, त्यासाठीचा निधी तसेच तांत्रिक बाबींच्या मान्यतेसाठी हा प्रस्ताव शासनाकडे प्रलंबित आहे. याबाबत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नुकतीच बैठक बोलाविली होती.
या बैठकीस महापालिका आयुक्तांसह, शहर अभियंता प्रशांत वाघमारे, जलसंपदा विभागाचे अधिकारी तसेच नगरविकास विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
जलसंपदा विभागाचा आक्षेप
या कालव्यावर रस्ता करण्याबाबत बैठकीत चर्चा करण्यात आली. मात्र, जलसंपदा विभागाने या कालव्याच्या बाजूला मोठया प्रमाणात झोपडपट्टया असून रस्ता होणार नसल्याची भूमिका घेतली. मात्र, महापालिकेने रस्ता होऊ शकतो याबाबत भूमिका घेतली. त्यावर या कालव्याची रुंदी 40 मीटर आहे. त्यामुळे हा रस्ता होऊ शकत नसल्याने जोड रस्ते तसेच प्रत्यक्ष जागा लक्षात यावी, यासाठी महापालिकेने ड्रोन सर्वेक्षण करून अहवाल सादर करण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री पवार यांनी केल्या.