इस्लामाबाद – मुंबईवर झालेल्या २६/११ दहशतवादी हल्ल्याच्या आठवणी अजुनही भारतीयांच्या मनात खोलवर रुतलेल्या आहेत. या दहशतवादी हल्ल्याचा सुत्रधार हाफीस सईदला न्यायालयाने निर्दोष मुक्त केलं आहे. पुराव्या अभावी त्यांची मुक्तता करण्यात आली आहे. सईद यांच्यासह जमात उद दावाच्या सहा नेत्यांची देखील लाहोर उच्च न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे.
याआधी लाहोर येथील दहशतवाद विरोधी न्यायलयाने या प्रकरणी हाफिज सईदसह सहा जणांना प्रत्येकी नऊ वर्षांची शिक्षा सुनावली होती. मात्र उच्च न्यालयाने ही शिक्षा रद्द केली आहे. या प्रकरणी पाकिस्तानातील पोलिस न्यायालयात सबळ पुरावे सादर करू शकले नसल्याचं सांगण्यात येत आहे.
हाफिज सईद हा जमात-उद-दावा या प्रतिबंधित दहशतवादी संघटनेचा म्होरक्या आहे. जमात-उद-दावा ही दहशतवादी संघटना २००८ च्या मुंबई हल्ल्यासाठी जबाबदार असून, या हल्ल्यात सहा अमेरिकी लोकांसह १६६ लोक मारले गेले होते. यापूर्वी हाफिज सईदसह या दहशतवादी संघटनेच्या नेत्यांना दहशतवादाला अर्थसहाय्य पुरवल्याप्रकरणी दोषी ठरवले होते.