नवी दिल्ली – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या अभिभाषणाने संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरवात झाली. मात्र, संसदेच्या सुरक्षेत खूप मोठा बदल बघायला मिळत आहे. संसदेची बाह्य सुरक्षा केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाकडे सोपविण्यात आली आहे. टप्याटप्यावर कडक बंदोबस्त बघायला मिळत आहे. उद्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन अंतरिम बजेट सादर करतील. हा त्यांचा सहावा बजेट असेल.
नवीन संसदेत 13 डिसेंबरला संसदेच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान लोकसभेच्या व्हिजिटर गॅलरीतून दोन तरुणांनी अचानक उडी मारली होती. यानंतर सुरक्षा व्यवस्थेचा पोकळपणा उघडकीस आल्यानंतर आज संसदेत कडक बंदोबस्त बघायला मिळाला. सामान्य माणसांना संसदेत प्रवेश थांबविण्यात आला आहे.
13 डिसेंबर रोजी झालेल्या सुरक्षेतील त्रुटी लक्षात घेऊन केंद्र सरकारने संसद भवन संकुलातील सुरक्षेत अनेक बदल केले आहेत. आता मुख्य दारावर तपास करायला दिल्ली पोलीस नाहीत. तर ही जबाबदारी आता सीआयएसएफकडे सोपवण्यात आली आहे. सीआयएसएफने संसद भवनात तपासणीची जवळपास तीच पद्धत अवलंबली आहे, जी सहसा विमानतळावर दिसते. आता संसद भवन संकुलात प्रवेश करण्यापासून ते कोणत्याही सभागृहात पोहोचेपर्यंत अनेक ठिकाणी ओळखपत्र दाखवावे लागत आहे. प्रवेशपत्र (स्मार्ट कार्ड) दाखवल्यानंतर बायोमेट्रिक पडताळणी होईल. त्यानंतरच एखाद्या व्यक्तीला प्रवेश मिळेल.
सीआयएसएफ व्यतिरिक्त संसद भवन संकुलात साध्या कपड्याच्या टीमची (इंटेलिजन्स ब्युरो) उपस्थिती वाढवण्यात आली आहे. पूर्वीप्रमाणेच संसद भवनाच्या एकूण सुरक्षेची जबाबदारी सीआरपीएफ आणि संसद सुरक्षा समूह (पार्लियामेंट ड्युटी ग्रुप) कडे कायम आहे.
संसदेच्या परिसरात पोलिसांचा पहारा कडक करण्यात आला आहे. पोलीस आणि संसद सुरक्षा कर्मचारी संसदेत येणाऱ्यांची कसून तपासणी करत आहेत. संसदेपासून अवघ्या मीटरच्या अंतरावर असलेल्या ट्रांसपोर्ट मंत्रालयाच्या बाहेर तैनात सुरक्षा कर्मचार्यांकडून ओळखपत्र तपासले जात आहे आणि खात्री पटल्याशिवाय कोणालाही बॅरिकेडमधून आत येवू दिले जात नव्हते. एवढेच नव्हे तर, संसदेकडे येणाऱ्या मार्गांवर कठडे उभे करण्यात आले आहे.
महत्वाचे म्हणजे, खासदार आणि व्हीआयपींच्या प्रवेशासाठी राखीव ‘मकर’ द्वार आणि दारासमोरच्या परिसराचे चित्र आज फार वेगळे दिसून आले. 2014 मध्ये भाजपला बहुमत मिळाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ज्या गेटवर आपले डोके टेकविले होते ते गेट म्हणजे संसदेच्या जुन्या इमारतीचे मुख्य प्रवेश द्वार. या प्रवेशद्वाराच्या अगदी समोर जे दार आहे ते आहे ‘मकर’ द्वार.
पत्रकारांसाठी मकर द्वार मिटींग पॉईंट. याच ठिकाणी पत्रकार केंद्रीय मंत्री, खासदार आणि व्हीआयपींना गाठतात आणि चर्चा करतात. परंतु, आज मकर द्वारापुढील मोकळ्या जागेत पत्रकारांनाही मज्जाव करण्यात आला होता. या द्वारापुढे चौफेर कठडे लावण्यात आले होते आणि आत फक्त खासदारांना प्रवेश होता. खासदारांच्या पीएंना सुध्दा मज्जाव करण्यात आला आहे.