कोलोंबो – श्रीलंकेमध्ये 9 मे रोजी सरकार विरोधी आणि सरकार समर्थक गटांमध्ये झालेल्या हिंसाचारासंदर्भात “सीआयडी’ने वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची आज चौकशी केली. या हिंसाचारामध्ये 10 जणांचा मृत्यू झाला होता, तर 200 पेक्षा अधिक जण जखमी झाले होते. माजी पंतप्रधान महिंदा राजपक्षे यांच्या समर्थकांनी सरकारविरोधात शांततेने निदर्शने करणाऱ्यांवर हल्ला केल्यानंतर या हिंसाचाराला सुरुवात झाली होती.
सरकारविरोधी निदर्शकांना हुसकावून लावण्यासाठी गॅले फेस येथे जात असलेल्या जमावाला रोखू नये, अशी सूचना आपल्याला पोलीस महानिरीक्षक चंदना डी. विक्रमरत्ने यांनी केली होती, असे पश्चिम प्रांताचे वरिष्ठ पोलीस उप महानिरीक्षक देशबंधू तेनारकून यांनी अध्यक्ष गोटाबाया राजपक्षे यांना सांगितले होते, अशी माहिती गॅले जिल्ह्याचे खासदार रमेश पाथीराणा यांनी या आठवड्याच्या प्रारंभी संसदेत दिली होती.
अध्यक्षांच्या आदेशानंतर, पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि जमावावर अश्रुधुराच्या नळकांड्या आणि पाण्याचे फवारे मारले. त्यामध्ये अनेक जण जखमी झाले आणि किमान 10 लोक ठार झाले होते.
सीआयडीच्या अधिकाऱ्यांनी आज विक्रमरत्ना यांची चौकशी केली. गेल्या आठवड्यात, श्रीलंकेच्या सीआयडीने संघर्षात सहभाग असल्याबद्दल सत्ताधारी “एसएलपीपी’ संसदीय गटाच्या तीन सदस्यांची चौकशी केली होती. यापैकी दोघाजणांना अटक करण्यात आली असून त्यांना 25 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. शुक्रवारी महिंदा राजपक्षे यांचे पुत्र आणि माजी मंत्री नमल राजपक्षे यांनाही सीआयडीने चौकशीसाठी समन्स पाठवले आहे.
सत्ताधारी आघाडी सरकारच्या सदस्यांनी जनता विमुक्ती पेरामुना या विरोधी पक्षाला 9 मे रोजी हिंसाचार भडकवल्याबद्दल दोष दिला. मात्र मार्क्सवादी पक्षाने या आरोपाचा जोरदार इन्कार केला आहे.