नवी दिल्ली – कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांच्यामुळे देशातील पेट्रोल विक्री तब्बल 20 टक्क्यांनी वाढल्याच्या बातमीने सर्वच अचंबित होतील. पण, तसा आरोपवजा दावा खुद्द केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीपसिंग पुरी यांनी केला आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या इंधनांचे दर मागील काळात विक्रमी पातळीवर पोहचले. त्यामुळे भारतात मोठी इंधन दरवाढ अटळ असल्याच्या चर्चांना उधाण आले. अर्थात, पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांची प्रक्रिया संपेपर्यंत दरवाढ होणार नसल्याचेही गृहीत धरण्यात आले. त्या चर्चांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक प्रक्रिया संपत आली असतानाच काही दिवसांपूर्वी राहुल यांनी एक ट्विट केले.
पटकन पेट्रोल टाक्या भरून घ्या. मोदी सरकारची निवडणूक ऑफर लवकरच संपणार आहे, असे त्यांनी म्हटले. त्यातून निवडणुकांची प्रक्रिया संपल्यावर इंधन दरवाढ होऊ शकते, असे राहुल यांनी सूचित केले.
राहुल यांच्या त्या ट्विटचा सोमवारी पुरी यांनी राज्यसभेत बोलताना नामोल्लेख टाळून समाचार घेतला. एका राजकीय नेत्याने तातडीने पेट्रोल भरून घेण्याचे आवाहन केले. त्यामुळे पेट्रोलचा खप 20 टक्क्यांनी वाढला. एका टिप्पणीमुळे 20 टक्के साठेबाजी होण्याची बाब लांच्छनास्पद आहे, असे ते म्हणाले.