अहमदाबाद – भारताची चांद्रयान 2 ही मिशन येत्या 20 ऑगस्टला चंद्राच्या कक्षेत जाणार आहे. ती मोहीम यशस्वरित्या पार पाडल्यानंतर सप्टेंबर 7 रोजी हे यान चंद्राच्या पृष्ठभागावर उतरवण्याचा महत्वाचा टप्पा पार पडणार आहे असे इस्त्रोचे अध्यक्ष डॉ. के. सिवान यांनी सांगितले.
सध्या यानाची प्रगती समाधानकारपणे सुरू असून येत्या दोन दिवसांत हे यान पृथ्वीच्या कक्षेच्या बाहेर पडणार आहे. भारतीय अंतरीक्ष संशोधन उपक्रमाचे जनक विक्रम साराभाई यांच्या जन्मशताब्दी निमीत्त आयोजित कार्यक्रमासाठी ते येथे आले होते. 22 जुलै रोजी चांद्रयान मिशन सुरू झाली आहे.
सिवान यांनी सांगितले की 14 ऑगस्टला रात्री साडे तीन वाजण्याच्या सुमाराला आम्ही हे यान पृथ्वीच्या कक्षेतून बाहेर काढून चंद्राच्या कक्षेत नेणार आहोत. त्यानंतर हे यान 20 ऑगस्ट पर्यंत चंद्राच्या भोवतीच्या कक्षेत फिरणार आहे. आणि तेथे अनेक महत्वाचे टप्पे पार पाडल्यानंतर अगदी शेवटच्या टप्प्यात 7 सप्टेंबर रोजी आपण चंद्राच्या पृष्ठभागावर उतरलेले असून. यानातील सर्व यंत्रणा अत्यंत सुरळीत सुरू आहेत असेही सिवान यांनी सांगितले. इस्त्रोच्या पुढील मोहीमांच्या संबंधात माहिती देताना ते म्हणाले की डिसेंबर मध्ये आम्ही काही छोटे उपग्रह प्रक्षेपित करणार असून इस्त्रोचे वैज्ञानिक सध्या त्या मोहीमेसाठी व्यस्त आहेत.