आगरतळा – त्रिपुरा राज्यात भारत आणि बांगलादेश सीमेवर गस्त घालणाऱ्या सीमा सुरक्षा दलाच्या जवानांच्या पथकावर एका दहशतवादी गटाच्या गनिमांनी जोरदार हल्ला चढवला. त्यात दोन सीमा दलाचे दोन जवान शहीद झाल्याचे वृत्त आहे. हल्ला करणारे दहशतवादी एनएलएफटी संघटनेचे होते अशी माहिती मिळाली आहे.
आर.सी. नाथ बॉर्डर नजिक सकाळी साडे सहाच्या सुमाराला हा हल्ला झाला. त्रिपुरा राज्यात भारत बांगलादेश यांच्यातील सीमा 856 किमीची आहे. त्याच्या रक्षणाचे काम बीएसएफ म्हणजेच सीमा सुरक्षा दलाकडे आहे.
आज झालेल्या हल्ल्यात बीएसएफचे उपनिरीक्षक भुरू सिंह आणि कॉन्स्टेबल राजकुमार हे शहीद झाले. शहीदांकडील शस्त्रेही हल्लेखोरांनी पळवून नेली आहेत अशी माहिती बीएसएफच्या सूत्रांनी दिली. हल्लेखोरांना शोधण्यासाठी व्यापक मोहीम हाती घेण्यात आली आहे.