नवी दिल्ली – पेगॅसस प्रकरणी आता एडिटर्स गिल्ड ऑफ इंडियानेही सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. संबंधित प्रकरणाच्या चौकशीसाठी विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापण्याची मागणी करणारी याचिका गिल्डने दाखल केली आहे.
पेगॅसस प्रकरण संसदेत आणि संसदेबाहेरही तापले आहे. पेगॅसस या इस्त्रायली स्पायवेअरचा वापर करून अनेक राजकीय नेते, पत्रकार आणि मान्यवर नागरिकांवर केंद्र सरकारने पाळत ठेवल्याचा आरोप होत आहे. त्या प्रकरणी चौकशीची मागणी करणाऱ्या काही याचिका याआधीच दाखल झाल्या आहेत. आता याचिका दाखल करणाऱ्यांमध्ये गिल्डचीही भर पडली आहे. गिल्डने माध्यम स्वातंत्र्याच्या सुरक्षेचा मुद्दा उपस्थित केला आहे.
सरकारकडून माहिती मिळवण्यासंबंधी जनतेचा हक्क बजावण्याचे कार्य पत्रकारांना करावे लागते. सरकारच्या सर्व शाखांना उत्तरदायी ठरवण्याचे कर्तव्य पत्रकारांना निभवावे लागते. त्यामुळे माध्यम स्वातंत्र्याची जपणूक गरजेची आहे. सरकारकडून केल्या न जाणाऱ्या हस्तक्षेपावर ते स्वातंत्र्य अवलंबून आहे, असे गिल्डच्या याचिकेत नमूद करण्यात आले आहे. तसेच, न्यायालयाच्या देखरेखीखाली एसआयटीमार्फत चौकशीची मागणी करण्यात आली आहे.